विधानसभेच्या निकालानंतर राज्यातलं सर्वाधिक चर्चेतलं गाव म्हणजे मारकडवाडी. ईव्हीएम विरोधाचे केंद्र बनलेल्या मारकडवाडीची नोंद देशभरातल्या नेत्यांनी घेतली. महाविकास आघाडीनेही मारकडवाडीच्या बॅलेट मतदानाच्या मागणीचं जोरदार समर्थन केलं. याच मारकडवाडीत मंगळवारी महायुतीकडून सभा घेत सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकरांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला
पवारसाहेब तुमची मुलगी सुप्रिया सुळे , नातू रोहित पवार ईव्हीएमच्या मतांमधूनच निवडून आले आहेत. ते निवडून आले की ईव्हीएम चांगले नाही आले की घोटाळा, असं कसं चालेल? सा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला.
advertisement
दोन धनगर नेते आमने-सामने, धनगर समाजाच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न?
मारकडवाडीच्या वादातून धनगर समाजाच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न तर केला जात नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलीय. कारण मारकडवाडीच्या मुद्यावरून एकीकडं उत्तम जानकरांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तर दुसरीकडं आता भाजपकडून गोपिचंद पडळकर मैदानात उतरले आहेत. त्यामुळे मारकडवाडीच्या निमित्तानं दोन धनगरनेते आमने-सामने आले आहेत.
शंभर शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्मतो, पडळकर यांची बोचरी टीका
गोपीचंद पडळकर यांनीही शरद पवार यांना जोरदार लक्ष्य केले. प्रगत देशांमध्ये ईव्हीएम आहे, पवार खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत. सभेला उपस्थित असलेल्या लोकांनो, हात वरती करून सांगा बॅलेट पेपर मतदान पाहिजे का? एवढे मोठ्याने सांगा की पवारांना ऐकू गेले पाहिजे. धनगर समाजाला का पुढे केले आहे? धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवायचे होते. म्हणून धनगर समाजाला त्यांनी पुढे केले. शंभर शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्मतो, अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली.
मारकडवाडी गाव सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय युद्धाचं कुरुक्षेत्र
विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूरचे मारकडवाडी आता सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय युद्धाचं कुरुक्षेत्र बनलं आहे. शरद पवारांनी मारकडवाडीतून ईव्हीएम विरोधी एल्गार केला आणि या राजकीय वादाची ठिणगी पडली. खोत आणि पडळकरांनी मारकडवाडीत सभा घेत पवार-मोहिते पाटलांना टार्गेट केलं. तर मुख्यमंत्र्यांनी मारकडवाडीत यावं अशी मागणी उत्तमराव जानकरांनी केलीये.
मारकडवाडी गाव कसं आहे?
मारकडवाडी गावात धनगर समाजाचं प्राबल्य आहे. गावातली एकूण मतदारसंख्या आहे २४००... विधानसभेत मतदान झालं १९०५... त्यापैकी उत्तम जानकरांना मिळाली ८४३ मतं तर राम सातपुतेंना १००३... मारकडवाडीतून मताधिक्य कमी झाल्याने जानकरांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली. तर हे गाव मोहिते पाटलांच्या दहशतीला जुमानत नसल्याने आपल्याला मताधिक्य मिळाल्याचा दावा राम सातपुतेंनी केलाय.
राजकीय हॉटस्पॉट बनलेल्या मारकडवाडीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही येऊन धडकले आणि त्यांनी इव्हीएमचा विरोध अधिक तीव्र केला. ईव्हीएम हटाव, देश बचाव चा नारा, बॅलेट मतदानासाठी उभारलेलं आंदोलन, महाविकास आघाडीच्या नेत्यांचं समर्थन यामुळे मारकडवाडीकडं सत्ताधारी आणि विरोधकांची वर्दळ वाढलीय. ईव्हीएम विरुद्ध बॅलेटचीही ही लढाई पुढे कोणतं वळण घेते हे पहावं लागेल.