उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं अजित पवार म्हणाले. मागच्याच महिन्यात अजित पवार यांनी अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून रेल्वे स्टेशनचं नावही शहराच्या नावासोबत जुळणारं करावं, अशी विनंती केली होती.
advertisement
'ही दीर्घकाळापासूनची मागणी होती, जी आता पूर्ण झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती वर्ष आपण साजरं करत आहोत, त्यामुळे या नामकरणाला विशेष महत्त्व आहे', असं अजित पवार म्हणाले आहेत. अनेक संघटना आणि नागरिक रेल्वे स्टेशनचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची मागणी करत होते. औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असं मागच्या वर्षी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, त्यानंतर अहमदनगरचं नामांतर झालं. अहिल्यादेवी होळकर या 18 व्या शतकातील महान मराठा राणी होत्या. मध्य भारतातील मराठा शासित माळवा राज्याच्या त्या 18व्या शतकातील महाराणी होत्या. अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यामध्ये झाला होता, त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेण्यात आला.