राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेकांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे. निवडणूक आयोगाने ३ डिसेंबर रोजीच मतमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आज महत्त्वाचा निकाल देताना मतमोजणी पुढे ढकलली आहे.
दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने राज्यातील काही नरगपरिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय न्यायालयाने दिला. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्यापासून अगदी मतदार यादीपासून प्रभागात दिलेल्या आरक्षणापर्यंत अनेक प्रकारचे घोळ समोर आले आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या आहेत.
advertisement
काही नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका आणि काही प्रभागातील मतदान हे २० डिसेंबर रोजी होणार आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन हायकोर्टाने एकाच दिवशी मतमोजणी करण्याचे आदेश दिले. आधीच निकाल जाहीर झाले असते तर निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले असते असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. एक्झिट पोलदेखील २० डिसेंबर रोजी मतदान संपल्यानंतर जाहीर होणार आहे. निवडणुकीची आचार संहिता ही २० डिसेंबरपर्यंत असणार आहे.
निवडणूक मतमोजणी पुढे का ढकलली?
काही नगर परिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व नगरपालिका, नगर परिषद निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. आधीच निकाल जाहीर झाल्यास नंतर, २० डिसेंबर रोजी होणाऱ्या २४ नगर परिषदांच्या मतदानावर आणि निकालावर त्याचा प्रभाव पडू शकतो, असा युक्तीवाद दाखल याचिकांमध्ये करण्यात आला होता.
नगर परिषद, नगर पंचायतीसाठी आज मतदान...
आज राज्यातील 264 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी मतदानाची वेळ असून, यासाठी 12 हजार 316 मतदान केंद्रांवर 62 हजार 108 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
