प्रहार शिक्षक संघटनेने सातत्याने या प्रश्नाचा पाठपुरावा केला असून, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तातडीने सुरू न झाल्यास मुंबईच्या आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. प्रदेशाध्यक्ष महेश ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री तसेच ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे ही भूमिका स्पष्ट केली होती. संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये सातवा टप्पा राबवण्यापूर्वी सर्व जिल्हा परिषदांमधील शिक्षक संवर्गाचे रोस्टर वेळेत अद्ययावत करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात यावेत, याचा समावेश होता.
advertisement
शिवाय, पेसा क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारच्या निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील 20 टक्के आणि पेसा नसलेल्या भागातील 80 टक्के रिक्त पदे आंतरजिल्हा बदलीसाठी खुली करण्याची मागणी करण्यात आली होती. उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठी राखीव पदांवर पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास, ती पदे शिक्षक भरतीप्रमाणे खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावीत, अशीही भूमिका संघटनेने मांडली आहे. याशिवाय 31 मे 2026 पर्यंतच्या सर्व रिक्त पदांचा विचार करून स्वतंत्र आणि स्पष्ट वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामीण विकास विभागाने या सर्व बाबींची दखल घेत कार्यवाही सुरू केल्यामुळे आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या 12 हजारांहून अधिक शिक्षकांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, ही प्रक्रिया पारदर्शक व वेळेत पूर्ण व्हावी यासाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही महेश ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
