अक्कुलखेडा गावात ही महिला पती आणि दोन मुलांसह वास्तव्यास होती. आज सकाळी सुमारे दहा ते साडेदहा वाजेच्या दरम्यान तिची मुलगी शाळेतून घरी परतली. घराचा दरवाजा उघडताच आत रक्ताच्या थारोळ्यात दोघांचे मृतदेह पडलेले दिसून आले. हा भयानक प्रकार पाहून मुलीने आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहिल्यानंतर मुलीला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोघांनाही उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. प्राथमिक तपासात दोघांच्या डोक्याला गावठी कट्ट्याने गोळी लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती
पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील युवक देवा धनगर याने विवाहित महिलेच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, याच पार्श्वभूमीवर ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र संपूर्ण तपास झाल्यानंतरच घटनेमागील नेमकी कारणे स्पष्ट होतील, असे पोलिसांनी सांगितले.
गावठी कट्टा आणि इतर साहित्य जप्त
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृत महिलेच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, घटनास्थळावरून गावठी कट्टा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तपासानंतरच या घटनेमागील संपूर्ण सत्य समोर येणार आहे.
हे ही वाचा :
