जळगाव : एरंडोल तालुक्यातील तीर्थक्षेत्र पद्मालयाजवळील जंगलात सापडलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात जळगाव पोलिसांना यश आले आहे. एका बिअरच्या बाटलीमुळे मारेकरी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पोलीस भरतीचे स्वप्न पाहणारा एक तरुणानेच ही हत्या केल्याचे उघडकीस आले असून मृत व्यक्ती ही तृतीयपंथी असल्याची माहिती समोर आली आहे.
आकांक्षा गेंद्र उर्फ अजय (वय 26, रा. छत्तीसगड) असे मृत तृतीयपंथीयाचे नाव असून जामनेर तालुक्यातील पहूर येथे राहणारा संदीप पाटील (वय 21) हा आरोपी आहे. 31 जानेवारी रोजी त्याने पद्मालय वनक्षेत्रात आकांक्षाची हत्या केली होती. 4 फेब्रुवारी रोजी पद्मालय परिसरातील जंगलात बकऱ्या चारणाऱ्या मुलांना एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. एरंडोल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह ओळख पटू नये म्हणून जाळण्यात आला होता. मात्र, घटनास्थळी पोलिसांना बिअरची एक रिकामी बाटली मिळून आली.
advertisement
नेमकं काय आहे प्रकरण?
आकांक्षा आणि संदीप दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. नाशिक येथे पोलीस भरतीची तयारी करत असताना स्वप्निल आणि आकांक्षा यांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचे संबंध अधिक दृढ झाले. मात्र, स्वप्निलला हे नाते पुढे ठेवायचे नव्हते. दुसरीकडे आकांक्षा या नात्यावर ठाम होत्या आणि स्वप्निलने कायम सोबत राहावे, असा तिचा आग्रह होता. स्वप्निलने नाते तोडण्याचा प्रयत्न केल्याने आकांक्षाने त्याची गावात तसेच विविध ठिकाणी बदनामी केल्याचे तपासात समोर आले आहे. या सततच्या त्रासामुळे आणि बदनामीच्या रागातून स्वप्निलने आकांक्षाची हत्या करण्याचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले.
हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती
घटनेच्या दिवशी दोघांनी एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन केले. त्यानंतर ते पद्मालयच्या जंगलात गेले. तेथे स्वप्निलने आकांक्षाच्या डोक्यात बिअरची बाटली मारून तिला बेशुद्ध केले आणि नंतर जाळून तिची निघृण हत्या केली. संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याने तपासाला वेग आला. फुटेजच्या आधारे स्वप्निलला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर संपूर्ण घटनेचा उलगडा झाला.
48 तासांत आरोपीला अटक
घटनास्थळी मयताचे केवळ हात व पाय मिळाल्याने ओळख पटवणे मोठे आव्हान होते. मात्र, आधुनिक तंत्रज्ञान, सीसीटीव्ही फुटेज आणि सखोल तपासाच्या जोरावर अवघ्या 48 तासांत आरोपीला अटक करून गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. या कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
