मुंबईत झालेल्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आमनेसामने आले होते. लॉबीत झालेल्या या तुफानी राड्यात ढकलाढकली, धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमक झाल्याने वातावरण तापले होते. विधानसभेच्या कामकाजात या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले होते. हा प्रकार गंभीर मानत समितीने घटनाक्रमाचा व्हिडिओ, प्रत्यक्षदर्शी सदस्यांचे जबाब आणि सुरक्षा अहवालांच्या आधारे तपास सुरू केला होता.
advertisement
तपास पूर्ण झाल्यानंतर शिस्तभंग समितीने टकले आणि नितीन देशमुख या दोघांना मुख्य जबाबदार धरत त्यांच्यावर कठोर कारवाईची शिफारस केली आहे. शिफारशीचा अंतिम निर्णय सभापती आणि अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांत या बाबतचा अंतिम आदेश प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
चौकशी समितीची शिफारस काय?
विधीमंडळ शिस्तभंग समितीने या दोघांवर कठोर दंडात्मक कारवाईची शिफारस केली असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. समितीकडून टकले आणि देशमुख यांना तुरुंगवासाची शिक्षा देण्याची शिफारस केल्याचेही समजते.
पावसाळी अधिवेशनात काय झालं होतं?
पावसाळी अधिवेशनात सभागृहात विरोधी पक्षांचा अंतिम आठवड्याचा प्रस्ताव जितेंद्र आव्हाड यांनी मांडला. त्यामध्ये त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी नुकत्याच झालेल्या वाद आणि त्यानंतर मिळालेल्या धमक्यांचा उल्लेख केला होता. गोपीचंद पडळकर यांनी त्या दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांविरोधात आक्रमक वक्तव्ये केली होती.
आव्हाड हे सभागृहातून बाहेर पडत असताना विधानभवनाच्या लॉबीत दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. त्यात आव्हाड यांचे कार्यकर्ते आणि पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यात हाणामारी झाली. या घटनेनंतर पोलिसांनी पडखळकरांच्या कार्यकर्त्यांना सोडून दिले होते. तर, नितीन देशमुख यांना ताब्यात घेत अटकेची कारवाई केली होती.
