जयदीप गणेश वाघ असे मृत चिमुकल्याचं नाव आहे. या घटनेला सुरुवातीला नैसर्गिक मृत्यूचा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र नेरळ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कसून तपास केला असता हा क्रूर खुनाचा प्रकार असल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणी पोलिसांनी जयवंता गुरुनाथ मुकणे (वय ३०) हिला अटक केली आहे. तिच्याकडे चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली. "शेजाऱ्याची मुलं माझ्या मुलांना मारतात म्हणून मी त्याला जीवे मारले," असं महिलेनं कबुली जबाबात सांगितलं आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
जयदीपचे वडील गणेश वाघ आणि आई पुष्पा हे दोघे ९ नोव्हेंबर २०२५ रोजी मजुरीसाठी बाहेर गेले होते. त्यांची मुले घरासमोर खेळत होती. याचवेळी शेजारी राहणाऱ्या आरोपी जयवंता मुकणे हिने जयदीपला उचलून घरामागील पायवाटेजवळ नेले आणि जयदीपचा गळा आवळून खून केला.
यानंतर तिने काहीच माहीत नसल्याचे नाटक करत, जयदीप बेशुद्ध झाल्याचे भासवत, हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा आभास निर्माण केला. मुलाला कळंब रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे कुटुंबाने परंपरेनुसार मुलावर अंत्यसंस्कारही करून टाकले.
पोलिसांनी केला पर्दाफाश
मात्र, एका जागरूक नागरिकाने नेरळ पोलिसांना गुप्तपणे माहिती दिली. माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठले. कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव यांच्या परवानगीने पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला आणि जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
शवविच्छेदन अहवालात जयदीपचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपी जयवंता मुकणे हिने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. विशेष म्हणजे जयदीपच्या खुनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच ८ नोव्हेंबरला जयवंताने मृत जयदीपच्या ४ वर्षांच्या मोठ्या बहिणीचाही गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो प्रयत्न फसला होता. दुसऱ्याच दिवशी तिने जयदीपला एकटे गाठून त्याचा जीव घेतला. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
