घटना केव्हा घडली?
शिरोळ तालुक्यातील तेरवाड गावातील पाटील मळ्यामध्ये 2 वर्षीय मंचरी खोत ही चिमुकली उकळत्या दुधात पडल्याची घटना मंगळवार 24 फेब्रुवारीला घडली होती. दुर्दैवाने त्या चिमुकलीचा उपचारादरम्यान जयसिंगपूर येथील खाजगी रुग्णालयात 1 मार्च रोजी मृत्यू झाला. शिरोळ तालुक्यातील तेरवाड गावात सोमवार दिनांक 23 पासून ग्रामदैवत श्री मंगरायासिद्ध देवाची यात्रा होती. यात्रेसाठी तेरवाड येथील पाटील मळ्यात लाटवाडी येथील महिला आपल्या माहेरी यात्रेसाठी तिच्या दोन वर्षांच्या मुलीसोबत आली होती.
advertisement
दरम्यान, मंगळवारी यात्रेचा नैवेद्य दाखवायचा असल्यामुळे घरातील सर्व मंडळी नैवेद्य करण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी माहेरी आलेली महिला आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीला दूध भात चारत होती. यावेळी पाणी आणण्यासाठी बाळाची आई आतल्या खोलीत गेली असता लहान चिमुकली देखील तिच्या मागे मागे गेली आणि तेथे उकळत्या दुधात चिमुकली मुलगी पडली याच वेळी तिला तातडीने बाहेर काढले. मात्र तिला जास्त प्रमाणात भाजल्यामुळे त्या चिमुकल्या मुलीला तात्काळ जयसिंगपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र उपचारादरम्यान रविवार 1 मार्च रोजी तिचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे यावेळी आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. उकळत्या दुधामध्ये पडलेल्या चिमुकलीचं नाव मंचरी खोत असं आहे, ती दोन वर्षांची आहे. ज्ञानेश्वर खोत आणि त्यांच्या पत्नीला लग्नाच्या तब्बल 20 वर्षांनंतर मुलगी झाली होती. खरंतर, ही घटना खोत कुटुंबीयांसाठी काळीज पिळवटून टाकणारी आहे. या घटनेमुळे खोत कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून तेरवाड गावावर शोककळा पसरली आहे.
