लातूर: लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. औसा रोडवर अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात एका विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राच्या वाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. तर अन्य 03 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण लातूर शहरात खळबळ उडाली आहे. जखमी विद्यार्थांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसाार, औसा रोडवर रविवारी सायंकाळच्या सुमारास पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर ही घटना घडली होती. विक्रम नारायण पांचाळ (तंत्रनिकेतन तृतीय वर्ष ) हा विद्यार्थी महाविद्यालयासमोर आपल्या मित्रांसोबत असताना सकाळी झालेल्या शिल्लक कारणावरून दोन गटांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि एका गटातील विद्यार्थी आणि इतरांनी धारदार शस्त्राने दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांवर वार केले. यात विक्रम पांचाळ याच्या छातीत गंभीर वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
तर या घटनेत आदित्य भारत साडे, सुजल बलभीम रेड्डी आणि सुशांत माणिक परांडे हे तिघेजण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था इथं दाखल करण्यात आलं असून तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी श्रीधर पाटील याच्यासह तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, घटनेच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर, गुन्हेगारीवर पोलिसांचे नियंत्रण राहिलं आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. शैक्षणिक लातूर पॅटर्नसाठी गाजलेल्या लातूर शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. गजबजलेल्या औसा रोड परिसरातील या थरारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
