नेमका वाद काय?
दरवर्षी रंगपंचमीच्या मुहूर्तावर मढी येथे मोठी यात्रा भरते. मात्र, गेल्या वर्षापासून या यात्रेला वादाचे ग्रहण लागले आहे. गेल्या वर्षी ग्रामपंचायतीने मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास मज्जाव करणारा ठराव मंजूर केला होता. या निर्णयामुळे मोठा गदारोळ झाला होता आणि हे प्रकरण अखेर न्यायालयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले. न्यायालयाने यावर अद्याप कोणताही अंतिम निकाल दिलेला नसतानाही, यंदाच्या यात्रेसाठी ग्रामपंचायतीने तोच पवित्रा घेतल्याने प्रशासन पेचात पडले आहे.
advertisement
सरपंचांची आक्रमक भूमिका
सरपंच संजय मरकड यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, ग्रामपंचायत आपल्या निर्णयावर ठाम असून यंदाही मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत जागा दिली जाणार नाही. या भूमिकेमुळे धार्मिक सलोखा धोक्यात येण्याची भीती सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रशासन सतर्क, पोलिसांचे लक्ष
यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक मढीत दाखल होत असतात. अशा संवेदनशील परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल सतर्क झाले आहे. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता, यात्रेच्या काळात मढीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाण्याची शक्यता आहे.
