उमेदवारी अर्ज बाद करण्याचा कट
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आपल्या भाषणात सरकारवर गंभीर आरोप केले. देशमुख यांनी म्हटले की, भाजपचे सरकार माझ्या मागे लागले आहे. पण मी यांच्या बापालाही घाबरत नाही. मी उमेदवारी अर्ज दाखल केला असता तर त्यात तांत्रिक चूक काढली असती आणि अर्ज बाद केला असता. यासाठी त्यांनी दिल्लीतील वकील आणून ठेवला असून माझ्या उमेदवारीत गडबड करणार असल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केला.
advertisement
अनिल देशमुख यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या रश्मी बर्वे प्रकरणातही तेच झाले. त्यांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र प्रकरणात कोर्टाचा निकाल निवडणुकीनंतर आला. कोर्टाने दोषी अधिकाऱ्यांना फक्त एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.
पुस्तकात 14 महिन्यांचा सगळा लेखाजोखा
आपल्यावरील आरोप खोटे असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की, मी ईडी, सीबीआयला घाबरलो नाही. चांदीवाल आयोगाने माझ्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगितले. माझ्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. माझ्याविरोधात कट रचला आणि तुरुंगात धाडण्यात आले. खोट्या आरोपात फसवण्यात आले. मी तुरुंगातील प्रकरणावर पुस्तक लिहिले असून 14 महिन्यांत काय झाले, याचा सगळा लेखाजोखा लिहिला असल्याचेही देशमुख यांनी म्हटले.
..तर कारवाई सुरू झाली असती
मी गृहमंत्री असताना जळगाव एसपीना फोन केला आणि गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करण्याचा दबाव टाकला असल्याचा आरोप लावण्यात आला. त्या प्रकरणात माझी सीबीआय चौकशी लावण्यात आली. मी उमेदवारी अर्ज दाखल केला असता तर या प्रकरणातील कारवाई सुरू केली असती. यासाठी मी अर्ज दाखल न करता सलीलला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले. मी फॉर्म भरला नसला तरी सलीलला निवडून द्या, असे आवाहन अनिल देशमुख यांनी केले.
महाविकास आघाडीचे सरकार येताच मला विधान परिषदेत आमदार करतील. त्यानंतर शरद पवार मला मंत्री करतील असेही अनिल देशमुख यांनी म्हटले.
