बुधवारी झालेल्या मतदानानंतर 10 पैकी 6 एक्झिट पोलमध्ये महायुती सत्तेवर येत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, सरकार स्थापनेची सूत्रे ही लहान घटक पक्ष आणि अपक्षांच्या हाती असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर अपक्ष, लहान घटक पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेचे बच्चू कडू यांनी मतदानानंतर महत्त्वाचा दावा केला आहे. संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी एकत्रित येत तिसरी आघाडी स्थापन केली. परिवर्तन महाशक्ती आघाडीने राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. आता, या विधानसभेच्या निवडणुकीत आपले उमेदवार विजयी होणार असल्याचे सांगितले.
advertisement
सरकार आमचं येणार, बच्चू कडूंचा फॉर्म्युला काय?
बच्चू कडू यांनी म्हटले की, कुणाचाही सरकार स्थापन करण्याची क्षमता कोणामध्ये नाही. आमच्या शिवाय कोणाचाही सरकार स्थापन होणार नाही असे त्यांनी सांगितले. वेळ आली तर अपक्ष आणि लहान पक्ष मिळून जर आम्ही मोट बांधणी केली तर हे मोठे पक्ष बाजूला हटवता येतील आणि लहान पक्ष सत्तेत येतील असेही बच्चू कडू यांनी सांगितले. राज्यात महाशक्तीच्या 15 ते 20 जागा येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोणाला पाठिंबा देणार?
बच्चू कडू यांनी सांगितले की, आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही, तर आम्ही मोठ्या पक्षाचा पाठिंबा घेऊ. मोठ्या पक्षाचे सरकार बनवण्यापेक्षा अपक्ष आणि लहान पक्षाचे सरकार बनू शकतो आणि त्यासाठी पाठिंबा कोणाचा घ्यायचा ते आम्ही ठरवू. राज्याचा आगामी मुख्यमंत्री लहान पक्षाचा असणार असल्याचे बच्चू कडूंनी सांगितले.
भाजपकडून अपक्षांना संपर्क साधला जाणार...
यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. काही एक्झिट पोलनुसार, राज्यात त्रिशंकू परिस्थिती राहण्याची स्थिती आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्यात लहान घटक पक्ष आणि बंडखोरांचे महत्त्व वाढणार आहे. त्याआधीच त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने रणनीति आखण्यास सुरुवात केली आहे. एक्झिट पोलनंतर भाजपकडून विजयाची क्षमता असलेल्या अपक्ष आमदारांसोबत संपर्काची रणनीति आखण्यास सुरुवात केली आहे. जिंकण्याची शक्यता असलेल्या भाजपच्या बंडखोरांशी पक्षाचे नेते संपर्क साधणार आहेत.
