नांदेड : मुसळधार पावसाने आणि पुराने हाताशी आलेली पिके उद्धवस्त झाली. या अस्मानी संकटाने बळीराजा उद्धवस्त झाला. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी मंत्र्यांपासून ते राजकीय नेत्यांनी पाहणी दौरे केले. मात्र, हे पाहणी दौरे शेतकऱ्यांसाठी होते की त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या अश्रूपेक्षा पाहणी दौऱ्यावर आलेल्या मंत्र्यांच्या बुटाला चिखल लागू नये याची काळजी अधिक घेतली गेली असल्याचे समोर आले आहे.
advertisement
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. नदीकाठच्या सुपीक जमिनी पाण्याखाली गेल्या, उभं पीक वाहून गेलं आणि शेतकऱ्यांची स्वप्नं चिखलात गेली. या हानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड गुरुवारी नांदेड दौऱ्यावर आले. मात्र त्यांच्या पाहणीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचीच भावना व्यक्त होत आहे.
मंत्री राठोड यांचा दौरा प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतात न पोहोचता ‘रोडटच’ जमिनींपुरता मर्यादित राहिला. पाय चिखलात जाऊ नयेत, कपड्याला माती लागू नये म्हणून प्रशासनाने लष्करी शिस्त लावल्याचे दृश्य दिसून आले असल्याचे वृत्त 'दैनिक लोकमत'ने दिले आहे. इतकेच नव्हे तर, पाऊस नसतानाही मंत्र्यांच्या डोक्यावर दोन-दोन छत्र्या धरून ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आली होती. या दरम्यान कार्यकर्त्यांची केविलवाणी धडपड सर्वांच्या नजरेत भरली.
अर्धापूर तालुक्यातील शेनी, नांदेड तालुक्यातील नांदुसा, हदगावमधील रूई-धानोरा, तसेच लोहा तालुक्यातील भेंडगाव आणि शेवडी येथील ‘रोडटच’ शेतांमध्येच पाहणी झाली. यापूर्वी कृषिमंत्र्यांनीही अशाच प्रकारे ‘हायवे-टच’ पिकांची पाहणी केली होती. खरी हानी सहन करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत ‘मंत्री महोदयांची नजर कितपत पोहोचली असा हताश सवाल उपस्थित झाला आहे.