राज्यातील सर्व नगरपालिकांची मुदत २०२२ पर्यंत संपुष्टात आली होती. पूर्वीच्या २३६ नगरपालिकांसह नव्याने स्थापन झालेल्या १० नगरपालिकांचा समावेश या निवडणुकांत आहे. करोना महासाथ, आरक्षणाबाबतच्या याचिकांसह इतर विविध कारणांनी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत.
advertisement
नगरपालिकांच्या निवडणुकीत बदल...
नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत तर नगरपंचायतींसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धत लागू होणार आहे. मतदारांनी नगराध्यक्षासाठी एक आणि प्रभागातील सदस्यांसाठी दोन असे प्रत्येकी तीन मतांचा वापर करावा लागणार आहे. तर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष आणि सदस्यपदासाठी प्रत्येकी एक अशी दोन मते देण्याची प्रणाली राहणार आहे. पहिल्या टप्प्यात २४२ नगरपालिका व ४६ नगरपंचायतींच्या ६,८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीने निवडणूक होईल.
युती-आघाडीचे काही ठरेना...
महायुती आणि महाविकास आघाडीत नगरपालिका निवडणुकांसाठी अद्याप राज्यस्तरीय आघाडीबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. युती-आघाडीबाबत सर्व प्रमुख पक्षांनी स्थानिक पातळीवर अधिकार सोपवले आहेत. स्थानिक समीकरणे, नाराजी आणि अंतर्गत गटबाजी टाळण्यासाठी ही भूमिका घेतल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. स्थानिक नेतृत्वाला स्वातंत्र्य दिल्याने काही ठिकाणी सोयीस्कर आघाडी तयार होण्याची शक्यता आहे. तर काही नगरपरिषदांमध्ये पक्षाचे अधिकृत चिन्ह न वापरता निवडणूक लढवण्याबाबतही चर्चा सुरू आहेत.
>> कुठं आणि किती जागांसाठी निवडणूक?
> नगरपालिका २४६
> नगरपंचायती: ४२
> एकूण जागा ६.८५९
>> निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा...
> अर्ज दाखल प्रक्रिया: १० ते १७ नोव्हेंबर
> अर्ज माघार २१ नोव्हेंबरपर्यंत
> मतदान : २ डिसेंबर
> मतमोजणी: ३ डिसेंबर
>> विभागनिहाय नगरपालिका व नगरपंचायती
कोकण : २७, नाशिक: ४९, पुणे: ६०, नागपूर: ५५, छत्रपती संभाजीनगर: ५२, अमरावती: ४५
