निवडणुकांची रणधुमाळी जवळ येत असताना, भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाल्याचं दिसत आहे. महायुतीनं महत्त्वाच्या पालिकांसाठी ‘नो रिक्स’ धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला असून, तिन्ही पक्ष — भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) — आगामी निवडणुका एकत्र लढणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
विरोधकांना संधी न देता जागा जास्त जिंकण्याचा निर्धार
advertisement
महायुतीतील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, "महत्त्वाच्या पालिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्याची गरज नाही. विरोधकांना संधी मिळण्याऐवजी तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता मिळवणं हेच उद्दिष्ट असणार आहे." या निर्णयामागे स्पष्टपणे एकत्र लढल्यास अधिक जागा जिंकण्याचा हिशेब असल्याचंही सांगितलं जात आहे. मागील निवडणुकांतील आकडेवारी आणि स्थानिक पातळीवरील आघाडीचं गणित पाहता, स्वतंत्रपणे लढण्यापेक्षा युती कायम ठेवणेच फायदेशीर ठरेल, असा महायुतीचा अंदाज आहे.
‘स्वबळा’च्या चर्चांना पूर्णविराम?
अलीकडेच, भाजप स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवेल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकेवर विजयाचा झेंडा रोवण्यासाठी महायुतीमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढवण्याबाबत विचार सुरू झाला आहे.
इच्छुकांचे काय होणार?
महायुतीने एकत्रित निवडणुका लढवल्यास अनेक इच्छुक नाराज होण्याची शक्यता आहे. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील अनेक कार्यकर्ते इच्छुक असतात. स्थानिक समीकरणेही वेगळी असतात. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवल्यास मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरण्याची शक्यता आहे.