जयंत पाटील यांचे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून रायगडवर मागील काही दशकांपासून वर्चस्व आहे. आता, या वर्चस्वाला धक्का लावण्याची तयारी भाजपने केली आहे. डाव्या चळवळीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शेकापच्या नेत्यांनी भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतल्याने याचे मोठे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील आणि भाचा आस्वाद पाटील हे आज आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माझ्या पक्षप्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात भाजप एक नंबरला येणार असल्याचा दावा देखील पंडित पाटील यांनी केला आहे. आस्वाद पाटील हे माजी आमदार मिनाक्षी पाटील यांचे सुपुत्र आहेत.
advertisement
पंढरपूरमध्ये समोर आली खदखद
शेतकरी कामगार पक्षाचे पंढरपूरमध्ये अधिवेशन पार पडले होते. या अधिवेशनात पंडित पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीत अलिबागमधून जयंत पाटील यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. तर, या मतदारसंघातून आस्वाद पाटील यांना संधी देण्याचा आग्रह पंडित पाटील यांनी धरला होता. मात्र, जयंत पाटील यांनी सूनेलाच तिकिट दिले. त्याशिवाय, विधानसभा आणि लोकसभा निवडणूक प्रचारातून पंडित आणि आस्वाद पाटील हे दोन हात लांबच होते.
त्यांना कळेल पंडित काय चीज आहे...
पंडित पाटील यांनी मंगळवारी भाजप प्रवेशाचे संकेत दिले. यावेळी त्यांनी जयंत पाटलांना आव्हान दिले.ाा रायगड जिल्ह्यात मला मानणारा मोठा वर्ग असून त्याचा भाजपला मोठा फायदा होईल असे त्यांनी म्हटले. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीत पंडित पाटील काय आहे ते कळेल असा इशारा त्यांनी जयंत पाटील यांना नाव न घेता दिला. त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याच दिसून येत आहे.
