थंडी गायब होणार गारठा राहणार
हवामान तज्ज्ञ डॉक्टर सुप्रीत यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात येत्या तीन दिवसांत किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होणार आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटे जाणवणारा गारवा कमी होऊन वातावरणात थोडा उबदारपणा जाणवेल. या तीन दिवसांच्या वाढीनंतर पुढील चार दिवस तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही, म्हणजेच हवामान स्थिर राहील. गुजरातमध्येही साधारण अशीच स्थिती असून तिथेही तापमानात वाढ होण्याचे संकेत आहेत.
advertisement
उत्तर प्रदेशमध्ये पश्चिमी विक्षोभ स्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरातून खाली दक्षिण दिशेला सायक्लोनिक सर्क्युलेशनची टर्फ रेषा तयार झाल्याने दक्षिणेकडे तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटकच्या दिशेनं सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. त्यामुळे कर्नाटकपासून कोकणापर्यंत अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाला आहे. तूर्तास पावसाचा इशारा नसला तरीही हवामानत अचानक बदल झाल्यास हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
प्रवास करताना काळजी घ्या
दुसरीकडे, उत्तर भारतात पंजाब आणि हरियाणासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. तिथे धुक्यामुळे दृश्यमानता ५० मीटरपेक्षाही कमी झाली आहे, ज्याचा थेट परिणाम रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीवर होत आहे. दिल्लीहून मुंबई किंवा पुण्याकडे येणाऱ्या विमानांच्या आणि रेल्वेच्या वेळापत्रकावर यामुळे मोठा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या भागांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा
याव्यतिरिक्त, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि हरियाणात ४ ते ६ जानेवारी दरम्यान तीव्र शीत लहरीची शक्यता आहे. दक्षिण भारताचा विचार केला तर तमिळनाडू आणि अंदमान निकोबार बेटांवर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. एकूणच, उत्तरेकडे थंडीचा हाहाकार सुरू असताना महाराष्ट्रात मात्र तापमानाचा पारा वाढल्याने थंडीचा जोर ओसरताना दिसेल असं हवामान तज्ज्ञ डॉक्टर सुप्रीत यांनी सांगितलं
विकेण्डला उकाडा वाढणार
नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोकण पट्ट्यात पाऊस झाला. त्यानंतर किमान तापमानात वाढ झाली आहे. सुरुवातीवला थंडीत काही प्रमाणात घट झाली आहे. दिवसा उकाडा तर मध्यरात्री आणि पहाटे गारवा जाणवत आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार तरी 8 ते 10 दिवस हवामान विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कोरडं राहणार आहे. किमान तापमानात कोणतीही घट होणार नाही. ते स्थिर राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
