धाराशिवमध्ये सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. अवकाळी पावसामुळे तुळजापूर आणि कळंब परिसरात द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसामुळे आता द्राक्ष पिकाला फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे... द्राक्ष पिकाला फटका बसल्यास 30 ते 40 टक्के नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
वर्ध्याच्या वाघोली शिवाराला गारपीट आणि वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. त्यामुळं टरबूज पिक जमिनदोस्त झालं. हातचं टरबूज पिक जमिदोस्त झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उन्हाळ्यात टरबूजला मोठी मागणी असते, हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्यानं शेतकऱ्यसमोर आत जगायचं कसं हा प्रश्न आहे. हिंगणघाट, देवळी, समुद्रपूर तालुक्यात काही गावात मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. गहू पीक झोपलं गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याच्या बांधावर अजूनही कृषी विभागाचा अधिकारी पोहचला नसल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.
advertisement
परभणी जिल्ह्यात काल झालेल्या रिमझिम पावसासह वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेत. अवघ्या काही मिनिटांच्या पावसाने उभ्या पिकांवर परिणाम झाला असून, प्रशासनाने पंचनामे करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
बीड जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचा हातातून अशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. ज्वारी हरभरा गहू व भाजीपाला वर्गीय पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्याचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्याकडून मागणी केली जातेय. बीड तालुक्यातील पाली शिवारात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड, पुसद तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसला. यात रब्बी हंगामातील गहू, हरबरा, पालेभाज्या, फुलशेती या पिकांचे मोठे नुकसान झाले. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा हा सोंगणीला आला होता अशातच या झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यावर्षी सुरुवातीला खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस सोयाबीन तूर या पिकांना फटका बसला होता तर आता रब्बी हंगामातील पिके निघण्याच्या मार्गावर असताना या वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झालं त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
नागपुरात अवकाळी पावसाचा नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांना तडाखा बसलाय. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर, हिंगणा, बुटीबोरी भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. आंब्याचा मोहोर, हरभरा, कपाशी, ज्वारी, मिरची आणि तूर पिकांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.
