बीडच्या कुर्ला येथील यशवंत विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर चक्क शाळेच्या टेरेसवर मंडप उभारून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसावं लागलं. ऊन वारा आणि गरमी यातच बाकड्यावर बसण्यासही व्यवस्थित जागा नसल्याने विद्यार्थ्यांना मात्र त्रास सहन करावा लागला. याबाबतीत संस्थेच्या मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांनी जुजबी उत्तर दिलं. यावर्षी विद्यार्थी संख्या वाढली आणि त्यामुळे हा प्रकार घडल्याचं केंद्रप्रमुखांनी मान्य केलं. उद्या शनिवारी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगितलं.
advertisement
टेरेसवर मंडप उभारून व्यवस्थित बैठक व्यवस्था देखील नव्हती. तब्बल 85 विद्यार्थी पायावरती पॅड ठेवून ताटकळत कसाबसा पेपर सोडवावा लागला. या विद्यार्थ्यांच्या तारांबळीचा आणि गुणवत्तेवर झालेल्या परिणामाला जबाबदार शिक्षण विभाग आहे. एक महिन्यापासून दहावीच्या परीक्षेची तयारी सुरू असताना या परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था नाही हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात का आले नाही?
या संदर्भात बीडच्या शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांना विचारला असता. आम्ही शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवले त्या ठिकाणचा अहवाल आल्यानंतर आम्ही लगेच त्या परीक्षा केंद्रावर कार्यवाही करणार आहोत. विशेष म्हणजे, या परीक्षा केंद्रावर असुविधा आहे. याची माहिती केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांनी आम्हाला कळवली नाही. त्यामुळे आम्ही या परीक्षा केंद्रावर केंद्रप्रमुखावर थेट आता कार्यवाही करणार आहोत, असं शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांच्या अडचणीची बातमी न्यूज १८ मराठीने दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागा झालं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यांनी कुर्ला येथे घडलेल्या परीक्षा केंद्रावरील बेजबाबदार पणा संदर्भात कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पारदर्शी परीक्षा घेण्यासाठी आम्ही 100 टक्के प्रयत्नशील आहोत असंही सांगितलं.
जिल्ह्यात १५६ परीक्षा केंद्रावर ४३ हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. ही सगळी परीक्षा केंद्र झूम च्या माध्यमातून कंट्रोल रूमची जोडून कॉपीमुक्तीचा प्रयत्न प्रशासन करत आहे. मात्र त्याचवेळी या परीक्षा केंद्रावरील सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल थांबणार कधी. न्यूज १८ मराठी ने बातमी दाखवल्यानंतर कुर्ला परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांचा उद्यापासूनचा प्रश्न मिटणार आहे. शिक्षण विभागाने केलेलं अक्षम्य दुर्लक्ष ग्रामीण भागातील परीक्षेचा वास्तव आणि शिक्षण विभागाचा गोंधळ दाखवत आहे.
