जालना: मराठा आरक्षणासाठी निर्णायक आंदोलनाचा टप्पा असल्याचे जाहीर केल्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा बांधवाचा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने निघाला आहे. अंतरवालीतून निघण्यापूर्वीच पोलिसांनी अटी घातल्या आहेत. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मराठ्यांच्या वादळाचा पहिला मुक्काम हा शिवनेरीवर असणार आहे.
advertisement
मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी आता थांबायचं नसून शांततेत मुंबईच्या दिशेने जायचं असल्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. सरकारकडून जाणीवपूर्वक आपल्या मुंबई मोर्चाची अडवणूक असल्याचा आरोपही जरांगे यांनी अंतरवालीतून केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर निर्णायक आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याआधी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना संबोधित केले. जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना आवाहन करताना म्हटले की, कोणीही कितीही डिवचलं तरी शांत राहायचं, कोणीही दगडफेक, हिंसाचाराच्या मार्गाचा अवलंब करायचा नसल्याचे त्यांनी म्हटले.
मुंबई मोर्चासाठी, सोमवारी रात्रीपासून अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांनी रात्रीपासूनच मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. हायकोर्टाने जरांगे यांना मुंबई मोर्चावरून खडसावल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी उशिरा रात्री पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली.
कोर्टाच्या सूचनांची प्रत खांबे यांनी जरांगेंना दिली आहे. कोर्टाच्या निर्णयाचा आदर करून मुंबईकडे निघू नका, अशी विनंती पोलिसांनी केली आहे. मात्र, जरांगे आपल्या निर्णयावर राहिले.
>>जालना पोलिसांकडून मनोज जरांगेंना कोणत्या अटी?
मुंबईतील आंदोलनासाठी निघालेल्या मनोज जरांगे यांना जालना पोलिसांनी जरांगे यांना अटी शर्तींसह जालन्यातून बाहेर पडण्यास मंजुरी दिली.
मुंबईच्या दिशेने होणार्या प्रवासा दरम्यान आक्षेपार्ह घोषणा तसेच जातीय तेढ निर्माण करणारी विधाने होणार नाही. याची दक्षता घेण्यास पोलिसांनी सांगितले आहे.
> प्रवासाचा मार्ग हा घोषीत केल्या प्रमाणेच राहील व नंतर बदलणार नाही याची दक्षता घ्यावी
> सदर प्रवासादरम्यान अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या अॅम्ब्युलन्स, फायरब्रिगेड आदीसह इतर वाहतुक / रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी मराठा मोर्चेकऱ्यांना घ्यावी लागणार आहे.
> प्रवासा दरम्यान खाजगी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई करण्याची जबाबदारी आयोजक आणि आंदोलनकर्ते यांची राहील ही बाबही पोलिसांनी नमूद केली आहे.
> सदर प्रवासामध्ये सहभागी होणारे नागरिक हे आपल्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचे घातक शस्त्र, लाठी, काठी, तलवार, लोखंडी गज, दगड किंवा ज्वलनशील पदार्थ बाळगणार नाहीत याची दक्षता घेण्याची सूचना पोलिसांनी आयोजकांना केली आहे.
यासह इतरही महत्त्वाच्या सूचना आणि अटी पोलिसांनी घातल्या आहेत.