मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याची हाक दिली. मुंबईत मराठा समाज उपोषण आंदोलन करणार आहे. 29 ऑगस्ट रोजी या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. मुंबईतील आंदोलनात सगळ्याच मराठ्यांनी आपले कामधंदे बंद ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. ऐन गणेशोत्सवात मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाचे वादळ धडकणार असल्याने राज्य सरकारने हालाचाली तीव्र केल्या आहेत. मराठा समाजाने आंदोलन पुढे ढकलण्याची मागणी केली जात असताना आता शासकीय पातळीवर सरकारने हालचाल करण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वीय सचिव राजेंद्र साबळे हे अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. साबळे हे जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. तर, दुसरीकडे जी चर्चा करायची ती सगळ्यांसमोर चर्चा करा, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
'न्यूज 18 लोकमत'सोबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. मी दोन वर्ष सामंजस्याने घेतलं दोन वर्ष चर्चांच सुरू आहे. मी 10 वर्ष आंदोलन करत बसू का मी दोन वर्ष वेळ दिला आता ते गोत्यात आले आहेत मला मुंबईत यायचं नव्हतं हे चार महिन्यांपूर्वीच ठरलं होतं, तीन महिन्यांचा वेळ दिला, कितीदा चर्चा, अंमलबजावणी आहे का? अंमलबजावणी नसेल तर काय अर्थ आहे. बदल होणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे म्हटले की, आंदोलन शांतपणे करणार आहोत. आंदोलनावर तोडगा काढायचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या सगळ्या मागण्या रास्त आहेत. दस्ताऐवजी जर सरकारी गॅजेट आहे तर आरक्षण द्यावं लागेल, त्यांना आरक्षण द्यायचं जीवावर आलं आहे. मी तर चाललोय, तुम्हाला यावंच लागणार आहे. तुम्ही झोपून राहिला आला नाहीत तर तुमच्या मुलाचं वाटोळं तुम्ही करणार असं म्हणत मुंबई मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मराठा समाजाला जरांगे पाटील यांनी केले.