७२ नगरसेवकांचा सत्कार, पण आत्मपरीक्षणावर भर
महापालिकेत निवडून आलेल्या ७२ नगरसेवकांचा भाजपच्या ‘वसंत स्मृती’ कार्यालयात मंत्री महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नाशिकसह जळगाव जिल्ह्यातील नगरसेवक, आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने महाजन यांनी यशाचे कौतुक करतानाच पक्षांतर्गत कमतरतांवरही स्पष्ट भूमिका मांडली. “जिथे अपयश आले, तिथे कारणे शोधली पाहिजेत. जनतेचा थेट फीडबॅक घ्या, तक्रारी ऐका आणि त्यावर काम करा,” असा सल्ला त्यांनी दिला.
advertisement
‘शंभर प्लस’चा नारा, पण अट्टाहासामुळे मर्यादा
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने ‘शंभर प्लस’चा नारा दिला होता. प्रत्यक्षात अनेक प्रभागांत विजय निश्चित वाटत असताना उमेदवारी प्रक्रियेत (एबी फॉर्म वाटप) झालेल्या गोंधळामुळे आणि अंतर्गत कुरघोड्यांमुळे नुकसान झाले. “अतिशय चांगली स्थिती असताना केवळ अट्टाहासामुळे ७२ जागांवरच थांबावे लागले, ही बाब पक्षासाठी योग्य नाही,” अशी खंत महाजन यांनी व्यक्त केली. पैसा, समाज, जात किंवा धर्म यापेक्षा जनतेसाठी केलेले काम महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पुन्हा निवडून यायचे असेल तर काम दिसले पाहिजे
नगरसेवकांना मार्गदर्शन करताना महाजन म्हणाले की, पुढील निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर काम करून दाखवावे लागेल. नागरिकांशी थेट संवाद, विकासकामांची अंमलबजावणी आणि पारदर्शक कारभार हाच यशाचा पाया आहे. यावेळी शहराध्यक्ष सुनील केदार, आमदार अॅड. राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विजय साने यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार
महाजन यांनी पक्षशिस्तीवरही ठाम भूमिका घेतली. प्रत्येक नगरसेवकाने पक्षादेशाचे पालन करावे, पक्षविरोधी भूमिका घेऊ नये आणि माध्यमांतून पक्षाची बदनामी होईल असे वर्तन टाळावे, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. “पक्षाची प्रतिष्ठा धोक्यात आणणाऱ्या कृती केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल,” असा दमही त्यांनी भरला.
महापौरपदावर भाजपचाच दावा
नाशिक महापालिकेत भाजपचाच महापौर अपेक्षित असून त्यासाठी प्रयत्न झाले असल्याचे महाजन यांनी सांगितले. बहुमताच्या जोरावर महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती ही पदे भाजपकडेच राहतील, असे संकेत त्यांनी दिले. यामुळे शिंदेसेनेला सत्तेत वाटा न देता विरोधी बाकांवर बसावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पुढील वाटचालीसाठी आत्मपरीक्षण गरजेचे
एकहाती सत्ता मिळूनही मोठ्या संधीचा पुरेपूर फायदा न उचलता आल्याची जाणीव भाजप नेतृत्वाने स्वीकारल्याचे या भाषणातून स्पष्ट झाले. आगामी काळात अंतर्गत मतभेद दूर करून संघटनात्मक बळकटी साधणे आणि कामगिरीतून जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे, हेच पक्षासमोरील प्रमुख आव्हान असल्याचे चित्र आहे.
