अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात बारामती येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली. राज्य शासनाकडून तीन दिवसांचा शासकीय दुखवटाही जाहीर करण्यात आला. संपूर्ण राज्य शोक सागरात बुडाले असताना मात्र मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने फाईलींवर सह्या करून आपला 'स्वार्थ' पाहिला.
प्रकरण नेमके काय आहे?
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला अवघे काही तास उलटलेले असताना त्यांच्याकडे असलेल्या अल्पसंख्यांक खात्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिव्य प्रताप केला. ज्या फायलींना ऑगस्ट महिन्यापासून स्थगिती देण्यात आली होती किंबहुना त्यावर निर्णय घेण्यात आले नव्हते, त्याच फायलींवर अधिकाऱ्यांनी मागे पुढे न पाहता स्वाक्षऱ्या केल्या.
advertisement
धक्कादायक गोष्ट म्हणजे, यातील पहिले प्रमाणपत्र अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी २८ जानेवारीला दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी दिले गेले. २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत देण्यात आलेली अशी ७५ प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत. या प्रमाणपत्रांना अल्पसंख्यांक विभागाच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये मंजुरी मिळाली, ती वेळ देखील नमूद आहे.
कोणकोणत्या संस्थांना लाभ?
महत्त्वाचे म्हणजे शासकीय कार्यालयांची वेळ संपल्यानंतरही साडे सहा, सात वाजताही फायलींवर सह्या झाल्या आहेत. 'पोदार'च्या २५ शाळांना २९ जानेवारी या एकाच दिवशी २५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलेला आहे हे विशेष. स्वामी शांती प्रकाश आणि देव प्रकाशच्या चार शाळांना देखील लाभ देण्यात आला आहे. सेवादास महाराज शिक्षक प्रसारक मंडळ यवतमाळला अजित पवार यांच्या निधनादिवशीच प्रमाणपत्र देण्यात आले. एकंदर अजित पवार यांच्या मृत्यूदिवशीच सात शाळांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
