शिवसेनेत असतानाही बाळा नांदगावकर यांची ओळख राज ठाकरे यांची कट्टर समर्थक अशी होती. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी वैर घेऊन राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला त्यावेळी त्यांच्यासोबतच बाळा नांदगावकर यांनीही शिवसेना सोडली. थेट बाळासाहेब ठाकरे यांना भेटून शिवसेना शाखेच्या किल्ल्या देऊ केल्या. परंतु काही वर्षांनी दोन भावांनी एकत्र आले पाहिजे, असा सूम उमटायला लागल्यानंतर त्यांच्या एकत्रिकरणासाठी नांदगावकर यांनी मनोमन प्रयत्न केले. अखेर हिंदीसक्तीच्या विरोधात आणि मराठी भाषेच्या सन्मानासाठी दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने नांदगावकर यांचे स्वप्न साकार झाले. दोन्ही पक्षांचे सूर जुळाल्यानंतर आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती करून लढविणार असल्याचे संकेत आहेत. त्याआधी मतदारयाद्यांवर आक्षेप नोंदवून मनसेसह महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. याच मोर्चाच्या घोषणेसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेला बाळा नांदगावकर यांनी शिवसेना भवनात हजेरी लावली.
advertisement
शिवसेनेतील सोनेरी दिवस आठवून बाळा नांदगावकर भावुक
शिवसेना भवनात आल्यानंतर बाळा नांदगावकर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शिवसेनेत असतानाच्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यात पाणी आले. शिवसेनेतील सोनेरी दिवस आठवून आपल्या भावनांना त्यांनी वाट मोकळी करून दिली.
नांदगावकर तब्बल २४ वर्षांनी सेना भवनात, जयंतराव पाटलांनी पहिल्यांदाच सेना भवनात पाय ठेवला
संजय राऊत यांनीही बाळा नांदगावकर यांच्यासह मनसे नेत्यांचे स्वागत केले. शिवसेना भवनात आज मनसेचे कॅबिनेट आले आहे, असा विशेष उल्लेख राऊत यांनी केला. बाळा नांदगावकर यांच्याबरोबर नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अभिजीत पानसे, राजू पाटील, अविनाश जाधव, अभ्यंकर आदी नेते आले होते. नांदगावकर हे तब्बल २४ वर्षांनी शिवसेना भवनात आले होते तर अभिजीत पानसे यांनी ११ वर्षांनी सेनाभवनात पाय ठेवला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे प्रथमच सेना भवनात आले होते.