नेमकं काय आहे 'अल निनो'चं संकट?
यंदाचा मान्सून सामान्य राहण्याऐवजी बिलो नॉर्मल म्हणजेच सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रशांत महासागरात वाढते तापमान आहे, ज्याला आपण हवामान शास्त्राच्या भाषेत अल निनो म्हणतो.
तज्ज्ञांच्या मते, सध्या प्रशांत महासागर न्यूट्रल कडून अल निनोकडे झुकू लागला आहे. जेव्हा जेव्हा अल निनो इवॉल्विंग म्हणजेच तयार होण्याच्या प्रक्रियेत असतो, तेव्हा तो भारतीय मान्सूनसाठी अत्यंत घातक मानला जातो. २०१४ आणि २०१८ सालीही अशीच परिस्थिती होती, ज्यावेळी पावसाने मोठी ओढ दिली होती आणि अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यंदाही तसाच काहीसा पॅटर्न पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
मान्सूनच्या एन्ट्रीला उशीर?
स्कायमेटचे तज्ज्ञ महेश यांच्या मते, पावसाचे प्रमाणच कमी होणार नाही, तर यंदा मान्सूनची सुरुवातही रखडण्याची दाट शक्यता आहे. साधारणपणे १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यंदा काही दिवस लांबणीवर पडू शकतो. जर मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला, तर त्याचा थेट परिणाम खरीप हंगामातील पेरण्यांवर होईल. सुरुवातीच्या काळात पावसाने ओढ दिल्यास दुबार पेरणीचे संकटही ओढवू शकते, असा इशारा हवामान विश्लेषकांनी दिला आहे.
नैसर्गिक आधारही कमकुवत
भारतीय मान्सूनला मदत करणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे इंडियन ओशन डायपोल. जर हा घटक सकारात्मक असेल, तर तो अल निनोचा प्रभाव कमी करतो. मात्र, यंदा हा आयओडी सकारात्मक असला तरी तो अल निनोच्या ताकदीसमोर फारसा टिकणार नाही, असे मॉडल्स सांगत आहेत. त्यामुळे यंदा निसर्गाचा जो नैसर्गिक आधार पावसाला मिळतो, तोही यंदा काहीसा कमकुवत राहणार आहे.
उष्णतेची लाट आणि पिकांवर परिणाम
अल निनो केवळ पावसावरच गदा आणत नाही, तर तो जमिनीचे तापमानही वाढवतो. यामुळे यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक राहू शकते. एप्रिल-मे महिन्यात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे आणि तीव्र उन्हामुळे उभ्या पिकांवरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
शेतकऱ्यांनी काय करावं?
या प्रतिकूल अंदाजाकडे पाहून घाबरून न जाता शेतकऱ्यांनी आतापासूनच पीक नियोजनात बदल करण्याची गरज आहे. यंदा अशा वाणांची निवड करावी जे कमी पावसातही तग धरू शकतील. बाजरी, कडधान्ये यांसारखी कमी पाणी लागणारी पिके घेण्यावर भर द्यावा. पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी शेततळी किंवा जलसंधारणाचे छोटे प्रकल्प आतापासूनच दुरुस्त करून ठेवावेत. हवामानातील बदलांना प्रतिकार करू शकतील अशा बियाण्यांचा वापर करणे हिताचे ठरेल.
हा शेवटचा अंदाज नाही...
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, हा स्कायमेटचा प्राथमिक अंदाज आहे. वसंत ऋतूमध्ये हवामानाचे मॉडल्स काही प्रमाणात त्रुटी दाखवू शकतात. येत्या एप्रिल महिन्यात भारतीय हवामान विभाग (IMD) आपला अधिकृत अंदाज जाहीर करेल, त्यावेळी परिस्थिती अधिक स्पष्ट होईल. मात्र, सध्याची लक्षणे पाहता शेतकऱ्यांनी 'सावध' राहूनच यंदाच्या हंगामाची तयारी करणे आवश्यक आहे.
