बदलापूर गाव आणि शिवराय
बदलापूर या गावाला शिवकाळात एक वेगळी ओळख होती. बदलापूर गावात छत्रपती शिवाजी महाराज घोडे बदलायचे असे सांगितले जाते. त्यामुळे हे गाव अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरले आहे. परंतु, याच आख्यायिकेतून येथील महागणपती मंदिराच्या उभारणीमागील काही कारणे पुढे आली आहेत. बदलापूर गावात पूर्वी घोड्याच्या पागा होत्या. तेथूनच घोडे बदलले जात होते, त्यामुळे बदलापूर हे नाव या गावाला मिळाल्याचे सांगितले जाते.
advertisement
गुरुवार गेमचेंजर ठरणार, क्षुल्लक चुकीमुळं पश्चातापाची वेळ येणार, मेष ते मीन आजचं राशीभविष्य
नवसाला पावणारा गणपती
बदलापूरचा हा महागणपती बुद्धी क्षेत्र म्हणून ओळखला जातो. नवसाला पावणारा गणपती म्हणून या देवस्थानाची ओळख आहे. ज्यांना मूल होत नाही, अशी जोडपी तिथे येऊन नवस बोलतात आणि तो नवस पूर्ण होतो, असे येथील भाविकांचे म्हणणे आहे. महागणपतीची मूर्ती भीमाशंकर येथून पालखीतून बदलापूर गावात आणल्याचे सांगितले जाते.
पेशव्यांनी केली दिवा-बत्तीची सोय
या मंदिराचे पेशव्यांशी खूप जवळील नाते आहे. पेशव्यांनी या मंदिराच्या दिवा-बत्तीला दोन होन आणि तीर्थ प्रसादासह अध्यात्मिक कार्यक्रमांसाठी मंदिरास 7 एकर जमीन दिल्याची इतिहासात नोंद आहे. सरकार दरबारी देखील याचा उल्लेख आहे. यासंबंधी देवस्थान समितीकडे त्याची तत्कालीन सनदही उपलब्ध आहे. महागणपती मंदिराची देखभाल आणि पूजा-अर्चा करण्यासाठी एक भिक्षुक सुद्धा आणले होते. हे भिक्षुक अलिबाग जवळील चरी गावातील होते. त्यांचे नाव रघुनाथ लवाटे असे होते. त्यांची 10 वी पिढी अजूनही गावात आहे.
दरम्यान, हे मंदिर आधी लाकडी बांधणीचे होते. एखाद्या कोकणातील घरासारखे हे मंदिर बांधण्यात आले होते. मंदिर कौलारू आणि पूर्वाभिमुख आहे. दीपमाळ आणि दर्शनी दरवाजासह तिन्ही बाजूंनी मंदिराच्या दक्षिणोत्तर भागांना जोडणारा कट्टा येथे होता. मंदिराच्या गाभाऱ्यात दोन-अडीच फूट उंचीची गणपतीची जुनी मूर्ती आहे. ही मूर्ती भीमाशंकर येथून पालखीतून बदलापूर गावात आणण्यात आल्याचे पुजारी मेघा आणि त्यांचा मुलगा वेदांत यांनी सांगितले. नवसाला पावणारा हा गणपती बुद्धिक्षेत्र म्हणून बदलापूरच नव्हे, तर ठाणे जिल्ह्यातील लोकप्रिय देवस्थान आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)





