महाराष्ट्रातील अद्भुत ऐतिहासिक ठिकाण, इथं प्रभू रामचंद्रांनी केलं होतं शिवलिंग स्थापन, इतिहास माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
महाराष्ट्रातील कित्येक ठिकाणांना अद्भुत ऐतिहासिक वारसा लाभला आहे. यामध्ये प्रार्थनास्थळे, मंदिरे यांचाही समावेश होतो. यातील काही मंदिरांच्या आख्यायिका आपल्याला अवाक करणाऱ्या असतात.
सांगली : महाराष्ट्रातील कित्येक ठिकाणांना अद्भुत ऐतिहासिक वारसा लाभला आहे. यामध्ये प्रार्थनास्थळे, मंदिरे यांचाही समावेश होतो. यातील काही मंदिरांच्या आख्यायिका आपल्याला अवाक करणाऱ्या असतात. असंच एक मंदिर सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या मधोमध रामलिंग बेट म्हणून उभे आहे. ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या रामलिंग बेटाविषयी अधिक माहिती आणि आख्यायिका जाणून घेऊ.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील बहे गावामध्ये रामलिंग बेट वसलेले आहे. या बेटावर प्रभू रामाचे प्राचीन मंदिर आहे. तसेच श्रीरामांनी स्थापन केलेले शिवलिंग आहे. यासह अनेक छोटी मंदिरे आहेत. मुख्य मंदिराच्या गाभऱ्यात राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमंत यांच्या मूर्ती आहेत. तसेच मागील बाजूस समर्थ रामदासांनी स्थापन केलेली हनुमानाची मूर्ती आहे.
advertisement
रामलिंग बेटाविषयी अधिक माहिती सांगताना येथील पुजारी श्रीराम बडवे यांनी पुरातन आख्यायिका सांगितली. असे म्हणतात की, प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवून परतत असताना याठिकाणी कृष्णाकाठी थांबले होते. यावेळी सीतामाता शेजारीच असणाऱ्या शिरटे गावात वास्तव्यास होत्या. येथे थांबल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी वाळूचे शिवलिंग स्थापन केले. आणि ध्यानस्थ होऊन त्याची पूजा करू लागले.
advertisement
इतक्यात कराडहून कृष्णा-कोयना या दोन नद्यांना पूर आला. परंतु पुराच्या व्यत्ययाने प्रभू रामांची शिवपूजा थांबू नये म्हणून मारुतीरायाने दोन्ही बाहू पसरून नद्यांचा पूर अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मारुतीच्या विशाल बाहूंनी नदीचा प्रवाह अडला आणि प्रवाहाचे विभाजन झाले. दोन्ही बाजूंनी पाणी गेले आणि मध्ये बेट तयार झाले.
हनुमानाने आपल्या बलवान बाहूंनी नदीचे पाणी थोपवून धरले. त्यामुळे नदीचे दोन वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले आणि आपोआपच बेट तयार झाले. याच कारणामुळे गावाचे नाव बाहे असे पडल्याचे सांगितले जाते. पण नंतर ते बहे झाले.
advertisement
येथे जायचे कसे ?
मुंबई - बंगळूरु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरून तुम्हाला जावे लागेल. इस्लामपूर शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. या बेटावर जाण्यासाठी तुम्ही गाडीने जाऊ शकता. पण तुम्हाला मुख्य रस्त्यावर दुचाकी, चारचाकी पार्क करावी लागते. यानंतर बेटापर्यंत उभारण्यात आलेल्या पुलावरून चालत जावे लागते.
नदीच्या अगदी मधोमध वसलेले हे बेट फारच नयनरम्य आहे. आजूबाजूला असणारा हिरव्यागार परिसर आणि अस्सल निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या या ठिकाणी अद्भुत शांतता आणि सांस्कृतिक वारसा अनुभवता येतो.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 7:13 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
महाराष्ट्रातील अद्भुत ऐतिहासिक ठिकाण, इथं प्रभू रामचंद्रांनी केलं होतं शिवलिंग स्थापन, इतिहास माहितीये का?









