रत्नागिरी : कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे. मात्र, याच उत्सवाच्या आनंदात खेड तालुक्यातील कोंडीवली रोहिदासवाडी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. मुंबईतून शिमगोत्सवासाठी गावी आलेल्या संतोष भागोजी कोंडविलकर यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. आदल्या दिवशी उत्साहात देवीची पालखी नाचवणाऱ्या व्यक्तीचा दुसऱ्या दिवशी पहाटे मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
संतोष कोंडविलकर हे मुंबईत सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपला व्यवसाय सांभाळत होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ते सहकुटुंब शिमगोत्सवासाठी आपल्या मूळ गावी आले होते. रोहिदासवाडीत ग्रामदेवतेच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी संतोष यांनी मोठ्या भक्तिभावाने पालखीचे स्वागत केले. रोहिदासवाडीतील विठ्ठल मंदिरात त्यांनी पालखी नाचवत ग्रामस्थांसोबत ढोल-ताशांच्या गजरात शिमगोत्सवाचा आनंद लुटला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या उत्सवात ते उत्साहाने सहभागी झाले होते.
ग्रामस्थांना अश्रू अनावर
रात्री आनंदाने पालखी नाचवल्यानंतर पहाटे त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कुटुंबीयांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली, मात्र नियतीने त्यापूर्वीच डाव साधला होता. अवघ्या 49 व्या वर्षी त्यांचा करुण अंत झाला. देवीची पालखी खांद्यावर नाचवली आणि दुसऱ्याच दिवशी देवाने त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले, अशा भावना व्यक्त करताना ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले होते.
मित्रपरिवार आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला
मुंबईत बांधकाम क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केलेले संतोष कोंडविलकर हे आपल्या मनमिळावू स्वभावासाठी परिचित होते. गावातील सामाजिक कामातही त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कोंडीवली परिसरासह मुंबईतील त्यांचा मित्रपरिवार आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका यशस्वी आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाच्या अशा जाण्याने कोंडीवली गावाने आपला हिरा गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. कोंडीवली रोहिदासवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. आकस्मिक निधनामुळे कोंडीवली गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोकणातील शिमगोत्सव सर्वात मोठा सण
कोकणातील शिमगोत्सव म्हणजे केवळ एक सण नसून तो लोककला, संस्कृति आणि श्रद्धेचा एक मोठा उत्सव आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमग्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ग्रामदेवतांची पालखी. अनेक गावात पालखी खांद्यावर घेऊन ढोल-ताशांच्या गजरात नाचविण्याची परंपरा आहे. गणेशोत्सवानंतर शिमगोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो.
