मुंबई : गणेशोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यावर, अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मुंबईत पुन्हा एकदा दहशतवादी बॉम्बस्फोटाची गंभीर धमकी मिळाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर अज्ञात व्यक्तीकडून संदेश पाठवण्यात आला आहे. मुंबईतील 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब बसवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
advertisement
या मेसेजनुसार, 400 किलो आरडीएक्सचा वापर करून मोठा स्फोट घडवण्याचा कट रचण्यात आला आहे. या हल्ल्यात एक कोटी लोकांचा बळी जाऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. या धमकीनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना आणखीच अलर्ट झाल्या आहेत. सगळ्या मुंबईत सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
कोणत्या दहशतवादी संघटनेच्या नावाने आली धमकी...
मुंबई पोलिसांना दिलेल्या धमकीच्या मेसेजमध्ये ‘लष्कर-ए-जिहादी’ नावाच्या संघटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात शिरल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. हे दहशतवादी मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे.
तपास यंत्रणा सक्रिय...
या घटनेची माहिती पोलिस मुख्यालय, एटीएस, सायबर सेल तसेच केंद्राच्या गुप्तचर विभागांना देण्यात आली आहे. मेसेज कोणी पाठवला, त्यामागे कोणाचा हेतू आहे, याचा तपास सुरू आहे. गणपती विसर्जन मार्ग, रेल्वे स्थानके, मॉल्स आणि सार्वजनिक ठिकाणी कडक नजर ठेवली जात आहे. हा मेसेज दिशाभूल करणारा, अफवा असण्याची अधिक शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, पोलिसांकडून कोणतीही जोखीम घेतली जात नसून सर्व बाजूने तपास सुरू आहे.
यापूर्वीही मुंबईत घातपात घडवण्याची धमकी मिळाली आहेत. वरळीतील फोर सीझन हॉटेलपासून ते सीएसएमटी स्थानकाला लक्ष्य करण्यापर्यंत अनेक धमक्या पोलिसांकडे आल्या होत्या. तपासाअंती त्या सर्व खोट्या ठरल्या होत्या.
मुंबई पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच संशयास्पद हालचाल किंवा वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.