राज्य सरकारने आता शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत या नव्या महामार्गाच्या कामाला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत होणारी कोंडी तर फुटेलच, पण मराठवाड्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक हाय-स्पीड पर्याय उपलब्ध होणार आहे.
प्रकल्पाचे स्वरूप आणि महत्त्व
हा महामार्ग 'मल्टिमोडल कॉरिडॉर' म्हणून विकसित केला जात असून, त्याची एकूण लांबी १३५ किलोमीटर आहे. हा संपूर्ण मार्ग चारपदरी (4-Lane) असेल. विशेष म्हणजे, शिक्रापूर, चाकण आणि तळेगाव या औद्योगिक पट्ट्यातून (MIDC) जाणाऱ्या जड वाहनांमुळे सध्या या मार्गांवर मोठी कोंडी होते. शिरूर-कर्जत हा नवा मार्ग तयार झाल्यामुळे ही जड वाहतूक शहराबाहेरून थेट मुंबईच्या दिशेने वळवली जाईल.
advertisement
प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचणार
सध्या मराठवाड्यातून मुंबईला जाणाऱ्या वाहनांना चाकण, शिक्रापूर, तळेगाव आणि लोणावळामार्गे जावे लागते. या नवीन मार्गामुळे मराठवाड्यातून येणारी वाहतूक शिरूर-खेड मार्गे थेट कर्जतला पोहोचेल. तर, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (Lonavala Ghat) ताण कमी होईल. त्याशिवाय, इंधन खर्च आणि प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होईल.
१२,५०० कोटींची गुंतवणूक; BOT तत्त्वावर काम
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १२,५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प 'बांधा-वापरा-हस्तांतरित करा' (BOT) तत्त्वावर राबविला जाणार आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबई-पुणे मार्गावर झालेल्या भयानक वाहतूक कोंडीनंतर सरकारने या पर्यायी मार्गाला प्राधान्य देण्याचे संकेत दिले आहेत.
