नेमकी काय आहे पार्श्वभूमी?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत सागर आणि आरोपी सोनाली यांचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, कालांतराने सोनालीचं लग्न राजू गजभिये याच्याशी झाले आणि त्यांना दोन मुलंही आहेत. लग्नानंतरही सागर आणि सोनाली एकमेकांच्या संपर्कात होते, ज्याचा राजू गजभिये याने विरोध केला होता. या प्रकरणी राजूने खापरखेडा पोलीस ठाण्यात यापूर्वी तक्रारही नोंदवली होती. तरीही सागर सोशल मीडियावरून सोनालीला त्रास देत होता. अनेकदा भेटायला बोलवत असे.
advertisement
इन्स्टाग्राम मेसेज अन् खेळ खल्लास
सागर वानखेडे हा पुण्यात वास्तव्यास होता, मात्र होळीच्या सणानिमित्त तो आपल्या गावी आला होता. गावी आल्यावर त्याने सोनालीला इन्स्टाग्रामवर भेटण्यासाठी मेसेज केला. यावेळी आरोपी पती-पत्नीने संगनमताने सागरला संपवण्याचा कट रचला. सकाळी १० वाजेच्या सुमारास सागर आणि सोनाली एकाच दुचाकीवरून जात असताना, एनवरे-कोराडी रोडवर सोनालीने मुद्दाम आपली पर्स खाली पाडली. सागरने दुचाकी थांबवताच सोनालीने सोबत आणलेल्या चाकूने त्याच्यावर दोन वार केले.
भररस्त्यात भीषण हत्या
सोनालीने हल्ला करताच, मागून पाठलाग करत आलेला तिचा पती राजू गजभिये तिथे पोहोचला. त्यानेही सागरवर धारदार शस्त्राने अनेक वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सागरचा जागीच मृत्यू झाला. दिवसाढवळ्या भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात राजू आणि सोनाली दोघंही मिळून सागरवर चाकूने वार करताना दिसत आहेत. यात सोनालीने सागरच्या केसांना पकडलं आहे, तर राजू चाकूने मानेवर वार करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोलीस कारवाई
घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही आरोपींना (पती-पत्नी) ताब्यात घेतलं. याप्रकरणी कोराडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
