नांदेड: नांदेडमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. गाळ काढण्यासाठी ड्रेनेज चेंबर मध्ये उतरलेल्या 3 मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, दोघे जण तडफडत असताना तिसरा कर्मचारी वाचवण्यासाठी धावला पण त्यात त्याचा मृत्यूही झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील मालटेकडी भागात महापालिकेचे मलशुद्धीकरण केंद्र आहे. खाजगी कंत्राटदारा मार्फत हे मलशुद्धीकरण केंद्र चालवले जाते. या ठिकाणच्या ड्रेनेज चेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने आज गाळ काढण्याचे काम सुरू होते.
advertisement
शंकर वरसवाड (वय 35 ) आणि राजू पुयड (वय 25) हे दोघे ड्रेनेज चेंबरमध्ये उतरले होते. पण गॅसमुळे श्वास गुदमरत असल्याने ते तडफड करू लागले. त्यांना वाचवण्यासाठी 30 वर्षीय गजानन पूयड हा देखील चेंबर मध्ये उतरला. पण तिघेही श्वास गुदमरून बेशुद्ध पडले. त्यानंतर घटनास्थळी उपस्थितीत असलेल्या इतक कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
गेल्या काही वर्षात गटाराच्या मेनहोलमध्ये गुदमरुन मृत्यू होण्याच्या अनेक बातम्या तुम्हा वाचल्या असतील. एखादी घटना घडल्यानंतर तेवढ्यापुरता तो मुद्दा तापतो. वातावरण निवळलं की पुन्हा पहिले पाढे पच्चावन्न अशी आपली स्थिती आहे. याविरोधात अनेक सामाजिक संस्थांनी आंदोलने केली, आवाज उठवला. मात्र, यामध्ये काहीही बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचिच प्रचिती देणारी एक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे आता कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.