नेमकं प्रकरण काय होतं?
फिर्यादी संदीप पाटील याने असा दावा केला होता की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील चोरला घाट परिसरात एका कंटेनरची लूट झाली. या कंटेनरमध्ये तब्बल ४०० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा होत्या आणि काही अज्ञात व्यक्तींनी आपले अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रारही त्याने दिली होती. इतक्या मोठ्या रकमेचा उल्लेख असल्याने या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती.
advertisement
एसआयटी तपास आणि विसंगती
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आदित्य मिरखेलकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आलं होतं. या पथकाने तांत्रिक बाबींचा कसून तपास केला. यात संशयितांचा आणि फिर्यादीचा लोकेशन डेटा, कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR), प्रवासमार्ग आणि घटनाक्रमाटा सूक्ष्म अभ्यास केला. या तपशीलवार तपासाअंती पोलिसांच्या लक्षात आले की, संदीप पाटील याने सांगितलेल्या घटनाक्रमात आणि प्रत्यक्ष पुराव्यांमध्ये मोठी विसंगती आहे. प्रत्यक्षात अशी कोणतीही लूट झाली नसल्याचं तपासात स्पष्ट झालं.
संशयितांची निर्दोष मुक्तता
या प्रकरणात पोलिसांनी गुजरात, मुंबई आणि कल्याण येथून किशोर सावला, विराट गांधी, जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, मच्छिंद्र मढवी आणि जनार्दन धायगुडे या सात जणांना ताब्यात घेतले होते. मात्र, सरकारी पक्षाला त्यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सादर करता आला नाही. दिवाणी न्यायाधीश आर. यू. इंगळे यांनी तांत्रिक पुरावे आणि घटनाक्रमाचे परीक्षण करून संशयितांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
न्यायालयाच्या निकालानंतर संशयितांच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा खोटा गुन्हा दाखल होण्यामागे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा हात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी आणि खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या संदीप पाटीलवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
