देशभरासह परदेशातल्या भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील एकूण 12 नवीन घाटांची लांबी 6,591 मीटरपर्यंत राहणार आहे. दरम्यान, सध्या नाशिक शहरामध्ये दहा घाट आहेत, आता आणखीन दहा नवीन घाटांची उभारणी झाल्यानंतर 20 पर्यंत घाटांची संख्या जाईल. नवीन घाटांची उभारणी झाल्यानंतर भाविकांना याचा विशेष फायदा होणार आहे. सुमारे 9 किमी लांबीच्या गोदावरी किनाऱ्यावर ही विस्तारयोजना राबवली जात आहे. नाशिकमधील प्रत्येक परिसराप्रमाणेच घाटांना नाव दिले जाणार आहे.
advertisement
नाशिकमध्ये उभारल्या जाणाऱ्या नवीन 10 घाटांची लांबी 3,451 मीटर असणार आहे. यासाठी अंदाजे 361.26 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. कपिला संगम घाट, नंदिनी संगम घाट, टाकळी संगम ब्रिज घाट, टाकळी संगम घाट, नांदूर दसक डावा काठ, नांदूर दसक उजवा काठ, ओढा घाट, सोमेश्वर धबधबा घाट, नवश्या गणपती घाट आणि लक्ष्मी नारायण घाट अशा 10 नव्या घाटांची निर्मिती करण्यात येणार आहे. तर त्र्यंबकेश्वरमध्ये 3140 मीटर डावा काठ आणि उजवा काठ अशा दोन नव्या घाटांची निर्मिती करण्यात येणार आहे. या दोन नव्या घाटांच्या निर्मितीसाठी अंदाजे 146.10 कोटी रूपये खर्चण्यात येणार आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 6,591 मीटर लांबीचा नवीन घाट उभारण्यासाठी 507 कोटी रूपये खर्चले जाणार आहे. 2027 मध्ये, सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. तर त्यासाठी मार्च 2027 पर्यंत संपूर्ण कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आले आहे. "घाट हे सिंहस्थाचे केंद्रबिंदु आहे. रस्ते, पार्किंग आणि आरोग्य सुविधा यांसारखी इतर सर्व पायाभूत सुविधा भाविकांना सुरक्षितपणे घाटापर्यंत आणण्यासाठी आणि परत नेण्यासाठी तयार केली जात आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या दोन्हीही काठांवर भाविकांची क्षमता वाढवून आणि त्यांचे आधुनिकीकरण करून सिंहस्थ 2027 च्या प्रमाणाला साजेशी व्यवस्था उभारली जाणार असल्याची प्रतिक्रिया," कुंभमेळा प्राधिकरणाच्या आयुक्तांनी दिली आहे.
