खरं तर, शनिवारी कॅप्टन खरातचा निकटवर्तीय आणि त्याच्या चारचाकीचे काही वर्ष सारथ्य करणाऱ्या दीपक लोंढेला एसआयटीने ताब्यात घेतल्याची बातमी व्हायरल झाली. यानंतर आता चौकशीसाठी पुढचा नंबर कुणाचा लागणार याबाबतही उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. एका मराठी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सिन्नरचे माजी नगराध्यक्ष कै. हरिश्चंद्र लोंढे यांचा मुलगा दीपक हा खरातचा निस्सीम भक्त होता. सार्वजनिक ठिकाणी भेट झाली तरी खरातच्या पायावर दीपक डोकं ठेवायचा, तेव्हा बघणाऱ्यांना आश्चर्य वाटायचे. हळूहळू तो खरातचा जवळचा बनला होता.
advertisement
खरातच्या ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळात दीपक नव्हता. मात्र, मंदिरावरचा एकही कार्यक्रम दीपकशिवाय होत नव्हता. धावपळीत तो सर्वांच्या पुढे असायचा. खरातला कधी बाहेरगावी जायचे असेल तर त्याच्या चारचाकीचे सारथ्य करायला हक्काचा माणूस दीपकच होता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर खरातच्या मुंबई वाऱ्या फारच वाढल्या होत्या. त्या वारीत दीपक त्याच्या सोबतच असायचा. खरातसह दीपकचा मुक्काम मुंबईतल्याच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असायचा, अशी चर्चा आहे.
या हॉटेलचा खर्चही शिंदे यांच्या माणसांकडूनच केला जायचा, अशी चर्चा तेव्हा व्हायची. पुढे याच संबंधातून दीपकची तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी गट्टी जमली आणि तो मुंबईकरच झाला. कधीतरी कार्यक्रमाला, उत्सवालाच तो सिन्नरला दिसायचा. केसरकर आणि त्यांच्या शिक्षण खात्यात रमलेल्या दीपकचे त्यानंतर खरातशी संबंध थोडे कमी झाल्याचे बोलले जाते. मात्र त्याचवेळी केसरकरांशी त्याचा घरोबा अधिक जवळचा झाला.
शिर्डीला अधूनमधून येणारे केसरकर दीपकच्या घरी जेवायला हमखास थांबू लागले. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर दीपकच्या मुंबई फेऱ्या कमी झाल्याचे बोललं जातं. मात्र, त्याचदरम्यान दीपक आणि खरातच्या संबंधातही दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आहे.
मध्यंतरी दीपकच्या पुतण्याचे लग्न झाले तेव्हाही खरातची अनुपस्थिती चर्चेचा विषय झाली होती. देशभरातील अनेक भाविकांना खरातच्या दरबारात घेऊन जाणारा दीपक एकदमच दूर झाल्याने त्यावेळी आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. ईशान्येश्वर मंदिराच्या उभारणीत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे नामकर्ण आवारे, राजेंद्र घुमरे यांनी सन २०२३ मध्ये तडकाफडकी शिवनिका संस्थानच्या सचिव व विश्वस्त पदाचा राजीनामा दिल्यानंतर तेथे काहीतरी गोंधळ असल्याची चर्चा सुरू झाली होती.
राजीनामा दिल्यानंतर ते मंदिराकडेही कधी फिरकले नाहीत की खरातलाही कधी भेटल्याचे कुणालाही बघायला मिळाले नाही. आवारे यांनी खरातशी अचानक घेतलेली ही फारकत तेव्हापासून चर्चीली जात आहे. खरातनेही याबाबतीत कुठे चर्चा केली नाही. राजीनामा मंजूर करून त्यांनी थेट नवे विश्वस्त निवडले. नवे विश्वस्त घेताना स्वतःच्या पत्नीलाही त्याने स्थान दिले. मात्र, जुन्या नावातील रूपाली चाकणकरांचे नाव पुन्हा विश्वस्त पदावर दिसल्याने त्यावेळी सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. त्यामुळे आता दीपक लोंढे यांच्यानंतर खरातशी संबंधित सर्वच लोकांची एसआयटीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
