होळीच्या दिवशी मध्यरात्री (सोमवारी- 02 मार्च) सिन्नर तालुक्यामध्ये समृद्धी महामार्गावर तीन ते चार चोरट्यांनी कारमधल्या एका प्रवाशांना लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. सिन्नर तालुक्यातील कोनांबा शिवरामध्ये चोरट्यांकडून कारच्या काचा फोडून, धारदार शस्रांचा धाक दाखवून प्रवाशांकडून लूट करण्यात आली आहे. उल्हासनगरच्या रहिवासी असलेल्या दीपा वाधवा, अंजू दाणी, सिया दाणी आणि छत्रपती संभाजीनगरमधील आणखी एक व्यक्ती अशा चौघांना चोरट्यांनी लुटलं.
advertisement
कोनांबे शिवारातील घाटाजवळ त्यांनी त्यांची कार थांबवली होती. तेव्हा रस्त्याच्या बाजूला असलेल्या पुलाजवळील डोंगराजवळून तीन ते चार संशयित समृद्धी महामार्गावर आले. संशयितांनी तोंडाला रुमाल बांधून आणि हातात लाठ्या- काठ्या घेऊन त्यांनी कारच्या काचा फोडल्या आणि धारदार शस्रांचा धाक दाखवून दीपा वाधवा यांच्याकडून 20 हजार हजार रुपये रोख रक्कम, सोन्याची अंगठी, कानातील टॉप, नथ, चांदीची अंगठी आणि पैंजण काढून घेऊन तिथून पसार झाले. दरम्यान, चोरी झाल्यानंतर दीपा वाधवा यांनी लगेचच जवळ असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चोरीची माहिती दिली.
चोरट्यांनी अंजू दाणी आणि सिया दाणी यांच्याकडील सुद्धा अनेक सोन्याच्या वस्तू चोरल्या आहेत. पोलिसांकडून सध्या चोरट्यांचा शोध घेतला जात असून वेगवेगळ्या ठिकाणी तपास पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या तपास पथकांकडून आरोपींचा शोध घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा शोध उपविभागीय अधिकारी के.के.पाटील, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब गाढवे आणि पोलीस उपनिरीक्षक अंकुश वारूंगसे हे पोलीस अधिकारी सध्या घेत आहे. घडलेल्या घटनेचा गुन्हा दाखल करताच पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली.
