रोहित पवारांनी काय गौप्यस्फोट केला?
या पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. व्हीएसआर कंपनीला सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांकडून वाचवलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास संथ गतीने होत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यात लक्ष घालावं, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. याबाबतचं पत्रही आपण मोदींना लिहिणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
advertisement
VSR कंपनीला खूप पॉवरफूल लोकांचा पाठींबा
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले, "अजितदादांच्या विमान अपघाताबाबत आम्ही जेवढा सखोल तपास करत आहोत. त्यात एकच गोष्ट आम्हाला दिसून येत आहे. ती म्हणजे व्हीएसआर कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा आहे. यातील बरेच लोक सत्ताधारी पक्षातील आहेत. काहीजण काही राज्यात सत्तेत आहेत. त्यांचा केंद्रातील सत्ताधारी पक्षाला पाठिंबा आहे. यात राजकीय पक्षांशी निगडीत असलेले मोठमोठे उद्योगपतीही या कंपनीशी संबंधित आहेत."
घातपाताबद्दल रोहित पवार काय म्हणाले?
घातापाताबद्दल बोलायचं झालं, तर आम्हाला दोन प्रकाराचा संशय आहे. राजकीय आणि कमर्शिअल... आता यात नेमकं कोणतं कारण खरं आहे, त्याचा शोध आम्ही घेत आहोत. यात व्हिएसआर कंपनी जबाबदार आहे. या कंपनीला कुणी वाचवत असेल तर तेही या कटाचा भाग असू शकतं. या कंपनीच्या मागे खूप शक्तीवान लोक आहेत. डीजीसीएचे अधिकारी आहेत, असा आरोप रोहित पवारांनी केला.
रोहित पवार पंतप्रधानांना देणार पत्र
रोहित पवार पुढे म्हणाले की, मला वाटतं अजितदादांना न्याय द्यायचा असेल, या प्रकरणात तपास करायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहच अजित दादांना न्याय देऊ शकतात, कारण बाकी लोक जे यात सहभागी आहेत, तेही पॉवरफुल आहेत. त्यामुळे मोदी आणि शहांना माझी विनंती आहे की त्यांनी यात लक्ष घालावं. मी एक पत्रही आज पंतप्रधानांना देणार आहे. इमेलच्या माध्यमातून हे पत्र देणार आहे.
आजच्या पत्रकार परिषदेतून आमची एक खूप मोठी मागणी आहे. ती म्हणजे नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा. त्यांचाच व्हीएसआर कंपनीला पाठिंबा आहे, असा आम्हाला संशय आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी आम्ही मागणी करतो. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देखील हे प्रकरण आपल्या हातात घ्यायला हवं, अशी आमची त्यांना विनंती आहे, असं रोहित पवार म्हणाले.
