महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर विधान परिषदेत शिक्षकांना भटक्या श्वानांची गणना करायला लावल्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार विक्रम काळे यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच विद्यार्थ्यांना शिकवण्यापलिकडे कोणतेही काम शिक्षक करणार नाही, असेही विक्रम काळे यांनी निक्षून सांगितले. त्यावर शिक्षकांना कुत्रे मोजण्याचे थेट आदेश दिलेले नसून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केवळ शाळा परिसरात स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याची जबाबदारी दिली आहे, असे मंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केले.
advertisement
राज्य शासनाने शिक्षकांचा अपमान केला, कुत्रे मोजायची कामे शिक्षकांना दिली- विक्रम काळे
राज्य शासनाने शिक्षकांचा अपमान केला आहे. शिक्षकांनी भटक्या श्वानांची गणना करावी, असे परिपत्रक कुणी काढले आहे? या खात्याचे पालक म्हणून आपण काय कारवाई करणार आहात? त्यांना जाब विचारणार की नाही? अशा सवालांच्या फैरी आमदार विक्रम काळे यांनी राज्य शासनावर झाडल्या.
शिक्षकांना कुत्रे मोजायचे काम? राज्य सरकारकडून खंडन
विक्रम काळे यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर उभे राहिले. ते म्हणाले, "माननीय सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबतीत सुयोग्य उपाययोजना करणे, शैक्षणिक परिसरात खाद्य पदार्थ पडलेले आहेत का? जर पडले असतील तर त्याची विल्हेवाट लावणे, या अनुषंगाने काही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. यासंबंधी शिक्षकांना देखील काही सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यांना कुठेही श्वानांची गणना किंवा श्वान पकडण्यास सांगितलेले नाही"
