अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी कोण घेणार, राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार, सरकारमध्ये त्यांची जबाबदारी कोण घेणार? अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक होता. याच प्रश्नांची उत्तरे प्रफुल पटेल यांनी दिली.
पवार कुटुंब ३ दिवसांचाच दुखवटा का पाळतं?
सगळ्यांची वेगवेगळी परंपरा असते. रूढी परंपरा वेगवेगळ्या असतात. पवार कुटुंबात त्यांची परंपरा आहे की ते तीन दिवसांचा शोक व्यक्त करतात. त्यानंतर आपले उत्तरदायित्व लक्षात घेऊन ते कामाला लागतात, यामुळे तिसऱ्याच दिवशी आम्ही सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली, येणाऱ्या दिवसात आम्हाला आणखी बरेच निर्णय घ्यावे लागतील, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.
advertisement
NCP एकत्रिकरण, पुणे बीडच्या पालकमंत्रिपदाचं काय? अर्थमंत्रिपद कुणाकडे जाणार?
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा राज्यात मोठ्या प्रमाणावर आहे. एकत्रिकरणावर दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात असताना प्रफुल पटेल यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे. आमच्या समोर एकत्रिकरणाचा लगोलग विषय नाही. कारण येणाऱ्या दिवसांत पक्षासंबंधी आम्हाला बरेच निर्णय घ्यायचे आहेत. दुसरीकडे अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थखाते त्यांच्या माघारीनंतरही आमच्याच पक्षाकडे राहिल तसेच पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही आमच्याकडेच राहील, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.
अजितदादांचा चेहरा अचानक डोळ्यासमोर येतोय
अजित पवार आणि माझे संबंध जवळपास ४० वर्षांपासूनचे होते. ते गेलेत यावर अजूनही विश्वास बसत नाही. त्यांचा चेहरा अचानक डोळ्यासमोर येतो. प्रफुल भाई आपली भेट आता होणार नाही, आता जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार सुरू आहे, मी व्यस्त असेल, असे अजित पवार मला शेवटचे बोलले होते, त्यांच्या याच वाक्याची मला आठवण येत राहील, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.
