मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी काही ओबीसी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत जीआर काढला. या निर्णयाच्या विरोधात ओबीसी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या गदारोळावर नाराजी व्यक्त केली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात गोंधळ घालणे म्हणजे स्वातंत्र्य सेनानींचा अपमान असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
advertisement
पोलिसांकडून तीन आंदोलक ताब्यात...
दरम्यान, पोलिसांनी 3 आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये रामभाऊ कोंडाजी पेरकर (70 वर्ष), शिवाजी बाबुराव गाडेकर (59 वर्ष) आणि अशोक सिंग किसन सिंग शेवगण (62 वर्ष) यांचा समावेश आहे. रामभाऊ पेरकर हे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वातील समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत. या आंदोलकांनी हैदराबाद गॅझेट रद्द झालेच पाहिजे, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणारे युती सरकार मुर्दाबाद, छगन भुजबळ झिंदाबाद अशा घोषणा दिल्या.
हे पोलिसांचे अपयश...
या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले की, मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आंदोलन करण्यासाठी हे व्यासपीठ योग्य नव्हतं. यासाठी सर्वात जबाबदार अपयशी पोलीस यंत्रणा आहे. सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरली असल्याचेही त्यांनी म्हटले.