ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडच्या पोलीस अधिक्षकांकडे एक अर्ज केला आहे. या अर्जामध्ये त्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील तपासात वाल्मिक कराड याच्या टोळीतील काही लोकांना ताब्यात घेतले असून यामुळे वाल्मिक कराड याची मुलं सुशील कराड आणि श्रीगणेश कराड यांच्याकडून माझ्या परिवारातील सदस्य दत्तात्रय मुंडे, अशोक मुंडे, प्रणव मुंडे, पंकज मुंडे, प्रवीण मुंडे आणि माझा भाऊ सतीश फड, वडील भगवान फड यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
advertisement
माझ्या परिवारातील या सदस्यांबाबत काही अनपेक्षित घटना घडल्यास सुशील वाल्मीक कराड आणि श्रीगणेश वाल्मीक कराड हे जबाबदार राहतील, असा तक्रार अर्ज ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षकांना दिला असून आता यावर पोलीस अधीक्षकांनी काय उपायोजना केल्या हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोघांच्या नार्को टेस्ट केल्याची माहिती समोर आली होती. त्या पाठोपाठ आता ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अशा पद्धतीने अर्ज दिल्याने या प्रकरणाशी वाल्मीक कराड आणि त्याच्या मुलांचा काही संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असून एसआयटीच्या तपासातूनच यातील सत्य समोर येऊ शकणार आहे.
अज्ञात तरुणांनी मुंडेंच्या मुलांना केली शिवीगाळ
तर दुसरीकडे, ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलाला दोन दिवसांपूर्वी एका अनोळखी मुलाने काहीही कारण नसताना शिवीगाळ केली. तसंच हातातील कडे फेकून मारले होते. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुंडे कुटुंबीयांनी या प्रकरणाचा तपास करणारे पंकज कुमावत यांना संपर्क साधला तसंच पोलीस अधीक्षकांना देखील अर्ज दिला आहे. याबरोबरच खासदार सुप्रिया सुळे यांना देखील याबाबतची माहिती दिली असून त्यांनी या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचं म्हटलं आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गीते हा देखील फरार आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ सतीश फड हे या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे गोट्या गीते याच्यापासून परिवाराला तसंच फड यांना धोका होऊ शकतो, अशी भीती देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली.
