पालघर रेल्वे स्थानकातील पार्सल घराला कुलूप ठोकून दरवाजावर केवळ 'डीआरएफ यांच्या आदेशाने' अशी नोटीस चिकटवण्यात आली आहे. विरार ते डहाणू रोड मार्गावर प्रवास करणाऱ्या स्थानिक फेरीवाल्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या बंदमुळे स्थानिक हजारो व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी, बागायतदार आणि आदिवासींचे नुकसान झाले आहे. ही रेल्वे सेवा कमी पैशांत, जलदगतीने देशांतर्गत आणि जगभरात माल पोहोचवला जात होता. कोणताही पूर्व विचार न करता रेल्वेने व्यापारांची पार्सल सेवा बंद केल्यामुळे स्थानिक व्यापारी आपला संताप व्यक्त करत आहेत.
advertisement
एकाच आदेशामध्ये संपूर्ण सेवा बंद करताना त्याचे परिणाम व्यवसायावर किंवा त्यांच्या दररोजच्या कामावर किती फटका बसेल? याचा साधा विचारही रेल्वे प्रशासनाने केला नसल्याचा संताप स्थानिक व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. विरार ते डहाणू रोड दरम्यानच्या अनेक शेतकऱ्यांचे पिके, फळ, फुले, दूध, भाजीपाला, मासे विक्री या पार्सल सेवेवर अवलंबून होते. तर, गुजरातमधून येणारा मावा, दुग्धजन्य पदार्थांसारखी कृषी उत्पादने, कोंबडी, बकरीसारखी जनावरे आणि मोटरसायकल यांची वाहतूक या पार्सल सेवेवर अवलंबून होती. या सेवेमुळे महाराष्ट्रातीलच नाही तर, गुजरातमधील शेतकर्यांनाही मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, विरार ते डहाणू रोड दरम्यानची पार्सल सेवा बंद झाल्यामुळे व्यापाऱ्यांना वसई किंवा वापीला जाऊन आपले पार्सल पाठवावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता आणखीनच आर्थिक भुर्दंड बसणार आहे. शिवाय, शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या कष्टात आणखीन वाढ होणार आहे. कमी उत्पन्न येत असल्याचं कारण देत, रेल्वेकडून ही सेवा बंद करण्यात आली आहे. खरंतर, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांसाठीही ही सेवा फार महत्त्वाची होती. गरजूंसाठी रोजगार, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि स्थानिक बाजारपेठा कायम सुरू ठेवण्याच्या दृष्टीने ही पार्सल सेवा कार्यरत होती, मात्र महसुलामुळे प्रशासनाला याचे सोयरसुतक नसल्याची टीका होत आहे.
