पनवेल : चारचाकीने दिलेल्या धडकीमध्ये दुचाकीवर असणारे तीन जण 25 फूट खाली कोसळल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा अपघात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालक हर्षद प्रकाश जैन (वय 32, राहणार रेवदंडा, अलिबाग) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
मुंबई-गोवा महामार्गावरील तारा गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर हा विचित्र अपघात झाला आहे. आशिष सिंग परदेशी (उलवे) हे त्यांच्या मित्रांसह कर्नाळा पक्षी अभयारण्य बघण्यासाठी गेले होते. पक्षी अभयारण्य पाहून झाल्यानंतर ते जेवणासाठी हॉटेलच्या शोधात मोटरसायकलने जात होते.
पनवेल ते गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून तारा गावाजवळील ब्रीजवर आले असता पनवेलच्या दिशेने अतिवेगाने जात असेली कार (क्रमांक एमएच 06 बीयू 8118) दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला गेली आणि अलिबागच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी (क्रमांक एमएच 43 बीटी 8177) ला जाऊन समोरून आदळली. या अपघातामध्ये दुचाकी चालवत असलेले सलमान शाह (वय 27) आणि त्यांच्यासोबत असलेल्या आदिती सिंग (वय 28) आणि गौरी खैरनार (वय 10) या दुचाकीवरून उडाले आणि ब्रिजच्या खाली अंदाजे 25-30 फूट खाली पडले. अपघातामध्ये तिघंही गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी कामोठ्याच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामध्ये आदिती सिंग हिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक शेळके अधिक तपास करत आहेत.