परभणी: पाऊस हा मराठवाड्यावर अक्षरशः काळ बनून आल्याचं पाहायला मिळतंय. धाराशिव, बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. नदी-नाल्यांना पूर आला असून शेतात तळे साचले आहे. सोयाबीनला कोंब फुटले असून कापसाच्या अक्षरशः वाती झाल्यात. परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगाव येथील शेतकऱ्यांचे देखील मोठं नुकसान झाले असून लोकल 18 ने या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
advertisement
परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्याला 22 सप्टेंबरच्या रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढलं. या पावसात तालुक्यातील ब्राह्मणगाव आणि आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेली असून शेताला तळ्याचं रूप आलंय. सोयाबीन, कपाशी, हळद, ऊस यांसारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
Heavy Rain In Jalna : मुसळधार पावसाने सोयाबीन- कपाशीला आले कोंब, शेकडो शेतकरी चिंताग्रस्त
एवढं नुकसान होऊन देखील कोणताही प्रशासकीय अधिकारी पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाला नाही. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी देखील बांधावर फिरकत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये आक्रोश असल्याचे पाहायला मिळतंय. कुणीतरी या आणि आमचं दुःख वाटून घ्या अशी आर्त हाक ब्राह्मणगाव येथील शेतकरी देत आहेत.
आमचं झालेलं नुकसान हे कधीही भरून निघणार नाही. माझी तीन एकर कपाशी आणि दोन एकर सोयाबीन असे एकूण पाच एकर शेत पूर्णपणे पाण्यामध्ये आहे. एक तुषार संच वाहून गेला असून एक पाण्यामध्येच आहे तो काढता देखील येत नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे पाठ फिरवली आहे. राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 50 हजार रुपये मदत शेतकऱ्यांना करावी अशी मागणी शेतकरी किरण खोसे यांनी केली आहे. तर या गावातील राम खोसे, गणेश खोसे, विनायक खोसे, विराट खोसे यांचं देखील मोठं नुकसान झालं आहे.