अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मकर संक्रांतीला पतंग उडविण्यासाठी वापर केला जाणारा हा मांजा अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे गेल्या काही दिवसांत या मांजामुळे गंभीर जखमी होण्याच्या घटना वाढल्या असून नागरिकांत चिंता वाढली आहे. अहिल्यानगरमध्ये घडलेल्या एका घटनेने तर थरकाप उडवला आहे.
advertisement
कोपरगावमधील लक्ष्मीनगर परिसरात पतंग उडवताना हाय व्होल्टेज वीज तारेला स्पर्श झाल्याने 14 वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. तर 19 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी अर्णव महेश व्यवहारे हा मकर संक्रांतीच्या निमित्ताने कोपरगाव येथे आपल्या मामाच्या घरी आला होता. अर्णव आपल्या मित्रांसोबत पतंग उडवण्यात मग्न होता. त्याच्यासोबत ऋषिकेश वाघमारे आणि इतर काही मित्रही होते. पतंग उडवताना अचानक पतंगाची दोरी किंवा हात शेजारील हाय व्होल्टेज वीज तारेला लागल्याने अर्णवला जोरदार विजेचा धक्का बसला.
मामाच्या गावी आला अन्....
धक्का इतका तीव्र होता की अर्णव जागीच कोसळला. त्याचवेळी ऋषिकेश वाघमारे यालाही विजेचा झटका बसून तो गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच अर्णवचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ऋषिकेशवर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, लक्ष्मीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पतंग उडवणे अत्यंत धोकादायक
मकर संक्रांतीच्या निमित्ताने सध्या सर्वत्र लहान मुले आणि तरुण मोठ्या उत्साहात पतंग उडवत आहेत. मात्र वीज तारांच्या जवळ पतंग उडवणे अत्यंत धोकादायक ठरू शकते, याचे हे दुर्दैवी उदाहरण आहे. अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहेय
