उद्धव ठाकरे यांच्या गटात सध्या एकूण 20 विधानसभेचे आमदार आहेत. मात्र त्यातील 8 ते 10 आमदार आमच्या संपर्कात असून 8 आमदार योग्य वेळी शिवसेना शिंदे गटात मध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे. योग्य वेळ आली की उद्धव ठाकरे गट रिकामा झालेला दिसेल. त्यावेळी संजय राऊत यांना बोलण्यासाठी तोंड राहणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केलं आहे.
advertisement
केंद्रीय मंत्र्याने अशाप्रकारे विधान केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे संभावित फुटीर आमदार नक्की कोण आहेत? याबाबत आता सस्पेन्स निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील ठाकरे गट फुटणार असल्याच्या अनेकदा चर्चा झाल्या. त्या अनुषंगाने राजकीय हालचाली देखील बघायला मिळाल्या. मात्र ऐनवेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने ठाकरे गटातील फूट टळली आहे. आता पुन्हा एकदा शिंदे गटाच्या केंद्रीय मंत्र्यानेच अशाप्रकारे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले प्रतापराव जाधव?
शिवसेना ठाकरे गटाच्या संभाव्य फुटीवर भाष्य करताना प्रतापराव जाधव म्हणाले, "योग्य वेळ येऊ द्या. राहिलेली शिवसेना देखील संपल्याशिवाय राहणार नाही. ८ ते १० आमदार सातत्याने आमच्या संपर्कात आहे. ते सर्वजण एकनाथ शिंदे यांच्याकडे येत असतात. त्यांची भेट घेतात. त्यांची कामंही करून घेतात. ठाकरे गटाचे काही खासदारही आमच्या संपर्कात आहेत. फक्त योग्य आकडा जुळायची आम्ही वाट पाहत आहोत. ज्या दिवशी आकडा जुळेल, त्यादिवशी संजय राऊतांना बोलायला तोंड राहणार नाही."