पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पश्चिम डोंगरी पट्ट्यातील दुर्गम भागात असणाऱ्या पाळू या गावातील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेली अश्विनी आपल्या जन्मजात हुशारीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2023 मध्ये झालेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात पहिली आली होती. घवघवीत यश संपादन करून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालणाऱ्या अश्विनीचे नाशिक येथे पीएसआयचे ट्रेनिंग सुरू होते.
advertisement
ट्रेनिंग सुरू असताना गणपतीसाठी म्हणून अश्विनी दोन दिवसांसाठी आपल्या गावी आली होती. दिनांक 27 ऑगस्टला गणपती बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 28 ऑगस्ट रोजी पुन्हा माघारी जाण्याच्या गडबडीत अश्विनी भल्या पहाटे उठली, आंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी तिने पाण्याच्या बादलीत हिटर लावला होता. पाण्यात हिटर लावल्यानंतर तिला पुन्हा डोळा लागला होता. तिला पुन्हा जाग येत पर्यंत पाणी चांगलेच उकळले होते. तिने तत्काळ हिटर बंद करून बाजूला ठेवला व आंघोळीसाठी ती उकळत्या पाण्याची बदली उचलायला गेली. मात्र त्याच दरम्यान तिचा पाय घसरला व बदलीतील उकळते पाणी तिच्या अंगावर सांडले. त्यात ती सुमारे 80% भाजली होती.
भाजलेल्या अश्विनीला उपचारासाठी तिच्या घरच्यांनी प्रथम मोशी येथील धनश्री हॉस्पिटल मध्ये व नंतर पिंपरी चिंचवड येथील डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथे जवळपास दहा दिवस अश्विनीवर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आश्विनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अश्विनीच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. गावकरी आणि मित्र परिवारही हळहळ व्यक्त करत आहेत.
खरंतर पीएसआय पदाला गवसणी घालणाऱ्या अश्विनीला येथेच थांबायचे नव्हते, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी होण्याचं तिचं स्वप्न होतं. हे स्वप्नही तिने साकार केलं असतं पण ग्रामीण भागातील अजूनही सुरू असलेल्या हिटरच्या साहाय्यानं पाणी तापविण्याच्या चुकीच्या पद्धतींची अश्विनी बळी ठरली. हिटरवर पाणी तापविताना घडलेल्या अपघाताची अश्विनी ही काही पहिली बळी नाही, यापूर्वीही अनेक दुर्घटनांमध्ये हिटरने अनेकांचे जीव घेतले आहेत. मात्र अजूनही त्याबाबत जनजागृती होताना दिसत नाही.