गतवर्षी एप्रिल महिन्यात पर्यटनासाठी काश्मीरला गेलेल्या पुण्यातील जगदाळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला. यानंतर सरकारने त्यांची उच्चशिक्षित लेक आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरीचे आश्वासन दिले. परंतु सरकारी अनास्थेमुळे अद्याप आसावरीच्या नोकरीचा प्रश्न सरकारला सोडवता आला नाही. याची आठवणी खुद्द आसावरीनेच करून दिली आहे.
पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येची व्यथा
advertisement
गेल्या काही दिवसांपासून आम्ही आर्थिक अडचणींचा सामना करीत आहोत. राज्य शासनाने नोकरीच्या आश्वासन दिले होते मात्र नोकरीच्या प्रस्तावाला मंत्रालयातून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र होऊ शकला नाही, अशी व्यथा दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे आणि पत्नी प्रगती जगदाळे न्यूज १८ लोकमतकडे मांडली.
आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या स्वीय सहाय्यकांना संपर्क करतोय, मात्र आमचा संपर्क होऊ शकलेला नाही. आमची परिस्थिती ओळखून आणि परिस्थितीचे गांभीर्य समजून सरकारने आमच्या मागणीवर निर्णय घ्यावी, अशी अपेक्षा आसावरी जगदाळे हिने व्यक्त केली.
उच्चशिक्षित आसावरीला अद्याप नोकरी का नाही? सरकारने संवेदनशीलता दाखवावी- सुप्रिया सुळे
पहलगाम हल्ल्यामध्ये पुणे येथील रहिवासी संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर त्यांची कन्या आसावरी यांना शासकीय नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली होती. स्वतः मुख्यमंत्री यासाठी अनुकूल होते. तरीही आसावरी यांना अद्यापही नोकरी मिळत नाही, याचे सखेद आश्चर्य वाटते. आसावरी या उच्चशिक्षित असून त्यांना पुरेसा अनुभव देखील आहे. त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार उचित नोकरी देण्याचा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठविला होता. परंतु तो अद्यापही मंजूर झालेला नाही. घरातील कर्ता पुरुष अचानक निधन पावल्यामुळे जगदाळे कुटुंब सध्या अनेक अडचणींचा सामना करीत आहे. माझी शासनाला नम्र विनंती आहे की आसावरी यांच्या नोकरीच्या प्रस्तावाची तातडीने दखल घ्यावी. पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या कुटुंबांबाबत एवढी संवेदनशीलता तरी हे सरकार नक्कीच दाखवू शकते, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
