वर्धा शहरात आज काढण्यात आलेला मूक मोर्चा पाहून उपस्थित प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले. या मोर्चाचे सर्वात हृदयद्रावक दृश्य म्हणजे भारत नागपाल यांचा अवघा दोन वर्षांचा चिमुकला मुलगा वेदराज. आपल्या वडिलांच्या हत्येचा अर्थही न समजणाऱ्या वयातील हा बालक, हातात "माझ्या बाबांना न्याय द्या" असा फलक घेऊन मोर्चाच्या अग्रभागी होता. आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी जणू तो मुकी विनवणीच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे करत होता.
advertisement
रेती घाटावरील पूर्वनियोजित कट
भारत नागपाल हे पुलगाव येथील प्रतिष्ठित उद्योजक आणि भाजपचे पदाधिकारी होते. वाळू घाटावर त्यांचा कट रचून खून करण्यात आला. या प्रकरणात वरोरा पोलिसांनी आतापर्यंत 12 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, मात्र मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. भाजप वर्तुळात या घटनेमुळे प्रचंड अस्वस्थता असून, हे 'गँगवॉर' की राजकीय हत्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नामदेव मठ येथून निघालेल्या या मोर्चात पंजाबी समाज, महिला आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
आंदोलकांनी काय मागण्या केल्या?
- आरोपींना थेट फाशीची शिक्षा व्हावी.
- प्रकरणाचा तपास तातडीने सीआयडी कडे सोपवण्यात यावा.
- खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्वरित न्याय मिळावा.
राजकीय वर्तुळात खळबळ
आमदार राजेश बकाने यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केल्याने सरकारवर दबाव वाढला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्याची अशा प्रकारे हत्या होणे हे कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे आहेत, अशी टीका होत आहे. नागपाल यांचे बंधू दिनेश आणि राम यांच्यासह हजारो नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आपल्या भावनांना वाट करून दिली. आता सरकार यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा :
